अवकाळी पावसामुळे शाळूच्या दुबार पेरणीचे संकट

Crisis Of Double Sowing Of Shalu crop Due To Untimely Rains Kolhapur Marathi News
Crisis Of Double Sowing Of Shalu crop Due To Untimely Rains Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : या महिन्यात अवकाळी पावसाने कहर केला. खरिपातील पिकांचे नुकसान तर झालेच, शिवाय काहीसा वाफसा मिळाल्यानंतर रब्बी ज्वारीची (शाळू) पेरणी केलेल्या काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती आहे. शाळूच्या पेरणीनंतर झालेल्या मोठ्या पावसाने शेतवडीत पाणी साठून बियाणे उगवलेच नसल्याचे चित्र तालुक्‍यात ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. 

ऑक्‍टोबरच्या सुरूवातीपासूनच अवकाळी पावसाने झोडपण्यास सुरूवात केली. ढगफुटीसदृश पाऊस होत असल्याने शेतवडीत पाणीच पाणी झाले. खरीप पिकांपासून समाधानकारक उत्पन्न हाताला न लागल्याने रब्बीच्या आशेवर असणारे शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाले. वाफसा आल्यानंतर रब्बी ज्वारीची पेरणी केली. आतापर्यंत 350 हेक्‍टरवर ही पेरणी झाली. अवकाळी पाऊस सर्वत्र एकाच वेळी झाला नसला तरी काही दिवसाआड प्रत्येक ठिकाणी पाऊस झाला.

काही ठिकाणी शाळूची उगवण झाली; परंतु बहुतांशी क्षेत्रातील शाळूच्या उगवणीला पावसाचे ग्रहण लागले. शेंद्री (ता. गडहिंग्लज) येथे शाळूचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. शाळू पेरणीनंतर जोराचा पाऊस झाल्याने शिवारभर पाणीच पाणी झाले. शेतांना तळ्याचे स्वरूप आले. बियाण्यांवर दाब पडल्याने ज्वारी जमिनीतून वर आलीच नाही. अति पावसामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. या नुकसानीचाही पंचनामा आताच्या पाहणी वेळी करावा, अशी मागणी उत्पादक शेतकऱ्यांची आहे. 

पंचनामा होत नाही म्हणे..? 
अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सध्या सुरू आहेत. शेंद्रीमधील शेतकऱ्यानेही कागदपत्र घेऊन कर्मचाऱ्यांकडे धाव घेतली; परंतु या पंचनाम्यात शाळू आणि हरभरा समाविष्ट नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे उत्पादक शेतकरी हैराण झाला. 

गडहिंग्लजमधील रब्बी ज्वारी... 
- एकूण क्षेत्र : 3076 हेक्‍टर. 
- आतापर्यंत पेरणी : 350 हेक्‍टर. 

शासनाने मदत करावी
मोठ्या पावसामुळे शेंद्रीमध्ये ज्वारी उगवलेली नाही. पंचनाम्यासाठी शेतकरी गेले; परंतु त्यात शाळू व हरभरा यांचा समावेश नसल्याचे सांगितल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. मुळात पावसामुळेच हे नुकसान झाले असताना पंचनामा कसा होत नाही, हा प्रश्‍न आहे. दुबार पेरणीचे संकट असल्याने शासनाने मदत करावी. 
- अनंत कुलकर्णी, शेतकरी (शेंद्री). 

प्रस्ताव शासनाला पाठवू
अवकाळी पावसामुळे जर रब्बी ज्वारीची उगवण झाली नसेल, तर त्याची पाहणी करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. अशा क्षेत्राची पाहणी करून प्रस्ताव शासनाला पाठवू. 
- डॉ. नंदकुमार कदम, उपविभागीय कृषी अधिकारी- गडहिंग्लज. 

संपादन - सचिन चराटी

Kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com