कोल्हापुरात दोन ऑक्‍टोबरला होणार धनगर आरक्षण गोलमेज परिषद 

Dhangar Reservation Roundtable will be held on October 2 in Kolhapur
Dhangar Reservation Roundtable will be held on October 2 in Kolhapur

कोल्हापूर : दोन ऑक्‍टोबरला कोल्हापुरात धनगर आरक्षण गोलमेज परिषद होत आहे. तयारी पूर्ण झाली असून परिषदेत समाजाचे सर्व लोकप्रतिनिधी, आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार, विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील, अशी माहिती गोलमेज परिषदेच्या संयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली. 

धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कर्मभूमीतच समाजाने एकत्रित येत सामुदायिक निर्णय घ्यावा, अशी सर्व समाजाची इच्छा होती. त्यामुळेच दोन ऑक्‍टोबरला अक्षता मंगल कार्यालयात ही परिषद होत आहे. 

दोन आॅक्टोंबरला सकाळी दहा वाजता दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून परिषद सुरु होईल. परिषदेतच केंद्र, राज्य सरकार विरोधात धनगर आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करून आंदोलनाचे नव्याने रणसिंग फुंकले जाईल. परिषदेसाठी समाजाचे नेतृत्व करणारे सर्व नेते उपस्थित असतील. यात सर्व आजी-माजी आमदार, खासदार, मंत्री, लोकप्रतिनिधी, विविध संघटनांचे प्रतिनिधी सर्वजण एकत्रित येतील. आरक्षण लढाई आणखी तीव्र करण्यासाठी अन्‌ जिंकण्यासाठी एकमताने सर्व समाजाचा एकमुखी निर्णय घेतील. ते आपल्या समाजाची भूमिका मांडतील. परिषदेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज, थोरले सुभेदार मल्हारराव होळकर, पुण्यश्‍लोक अहल्याबाई होळकर, महाराजा यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमा मध्यभागी असतील. पिवळा झेंडा असेल. विशेष म्हणजे, या ठिकाणी भाषण होणार नाही. 

धनगर जमातीचा एकही खासदार सध्या लोकसभेत नाही. त्यामुळे धनगर आरक्षणाचा प्रश्न लोकसभेत कोणीही उपस्थित करत नाही. परिणामी, घटनेत करावी लागणारी दुरूस्ती, कायद्यातील त्रुटी दूर करण्याबाबत काहीही होत नाही. त्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. त्यामुळे केंद्र सरकारनेच आता याप्रकरणी स्वतःहून पुढाकर घ्यावा. लोकसभेत चर्चा करावी. धनगर आरक्षणावर देशातील सर्व राजकीय पक्षांचे एकमत घडवून आणावे. राज्य सरकारची मदत घेऊन सध्या सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईत धनगर आक्षरण अंमलबजावणीच्या बाजुने भूमिका घेऊन केंद्र-राज्य सरकारने धनगर समाजाबरोबर आहोत. सामाजिक न्यायाच्या बाजूने आहोत हे कृतीतून सिध्द करावे, अशी भूमिकाही संयोजकांनी मांडली आहे. 

शिष्यवत्तीसह शैक्षणिक योजना, भूमिहीनांना जमिनी तसेच घरकुल योजनांचा लाभ होता. परिणामी, धनगर समाजाला दिलासा मिळणार होता; मात्र या सर्व योजना केवळ कागदावरती असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे परिषदेत महवाच्या प्रश्नांवरही चर्चा होईल.

महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या वाफेगाव येथील किल्याचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकात रूपांतर करण्याचा प्रश्न, मेंढपाळांचे, विद्यार्थ्यांचे, समाजाचे इतर प्र प्रश्नावरही परिषदेत चर्चा होईल. समाजाने परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com