कोल्हापूर : शहराच्या ज्या भागात नदीच्या पुराचे पाणी पसरते तेथील पूरबाधित नागरिकांचे वेळीच स्थलांतर करा, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज केली. गेल्या आठवड्यामध्ये आमदार जाधव यांनी शहरात पंचगंगा नदीचे पाणी येण्याची शक्यता आहे, अशा सर्व परिसराचा महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसोबत दौरा केला होता. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी केलेल्या सूचनांचा आढावा घेण्यासाठी आज बैठक आयोजित केली होती.
पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर नागरिकांनी केलेल्या सूचनांची त्वरित अंमलबजावणी करावी, असे आमदार जाधव यांनी सांगितले. शहरात 2005, 2019 मध्ये पूर पातळी किती होती, त्यावेळी नागरिकांचे स्थलांतर कशा पद्धतीने केले होते याची माहिती घेतली.
पूर परिस्थितीत शहरातील नागरिकांना पिण्यास पाणी मिळत नाही. बालिंगा येथील पंपिंग स्टेशन पुरात बुडाल्याने ऐन पावसाळ्यात शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो. त्या दृष्टीने पाण्याचे पंप उचलून घेण्याची सूचनाही त्यांनी केली. नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान होऊ यासाठी त्यांना वेळीच सूचना द्याव्यात, असेही सांगितले.
महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपायुक्त निखिल मोरे, रमेश मस्कर, रावसाहेब चव्हाण, बाबूराव दबडे, अग्निशामन प्रमुख रणजित चिले, आरोग्य निरीक्षक स्वप्नील उलपे, संदीप राजगोळकर उपस्थित होते.
दोन्ही खणींबाबत नियोजन करा...
शहरातील टाकाळा खण व सरनाईक कॉलनी येथील कदम खणीमध्ये पावसाचे पाणी मिसळून तेथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो, त्यासाठी दोन्ही खणींच्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधून पाणी खणीत मिसळू नये, यासाठी नियोजन करण्याचेही आमदार जाधव यांनी सांगितले.
आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले...
- शहरात पंचगंगा नदीचे पाणी येण्याची शक्यता
- पंपिंग स्टेशन येथील पाण्याचे पंप उचलून घ्या
- नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान होऊ यासाठी त्यांना सूचना द्या
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.