
आजरा : तालुक्यात दरवर्षी जंगलांना आगी लागण्याचे प्रमाण मोठे आहे. यात दरवर्षी सुमारे सरासरी 150 हेक्टर जंगल क्षेत्राला वणव्यांचा फटका बसत असल्याचे वन विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. वन विभागाकडून विविध उपाययोजनांचा अवलंब करूनदेखील वणवे रोखण्यात अपयश येत असल्याचे दिसत आहे. बहुतांश वणवे हे मानवनिर्मित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आजरा व गडहिंग्लज असे संयुक्त परिक्षेत्र (रेंज) आहे. या दोन तालुक्यांत 17 हजार 566.76 हेक्टर इतके क्षेत्र वनाखाली आहे. ही सर्व जंगले सह्याद्रीच्या रांगेत येतात. जगातील 9 संवेदनशील हे जैवविविधतेच्या प्रदेशापैकी अती महत्त्वाचे प्रदेश आहेत. यामध्ये आजरा व गडहिंग्लज परिसर येतो. या जंगलात बेहडा, वड, पिंपळ, नाना, हिरडा, चिंच, आपटा, पांगारा, सावर, सीताफळ, करंज, कोकम, बहावा, उंबर, आपटा, कांचन, कदम, फणस, आंबा, कवठ, बेल, मोह, पळस यांसारख्या असंख्य जातीचे वृक्ष आहेत.
अनेक वन्यप्राणी, पक्षी, दुर्मिळ जीव, जंतू, कीटक, सरीसृप प्राणी, फुलपाखरू व बेडकांच्या प्रजाती जंगल भागात आढळतात. त्यामुळे या विभागाची समृद्धता मोठी आहे; पण दरवर्षी लागणाऱ्या वणव्यात जैवविविधतेची मोठी हानी होते. वन विभागाने जाळ रेषा यासारख्या पारंपरिक उपाययोजनांसह आधुनिक योजनांचा अवलंब करूनदेखील जंगले जळत आहेत. आजपर्यंत लागलेले बहुतांश वणवे हे मानवनिर्मित असल्याचे स्पष्ट झाले आहे. जंगले टिकवायची असतील तर स्थानिकांत प्रबोधन करण्याबरोबरच ठोस उपाययोजनांचा अवलंब करणे गरजेचे आहे.
वन विभागाने पुढाकार घ्यावा
वनवैभव टिकवण्याची जबाबदारी सर्वांची असल्याने संयुक्त वन व्यवस्थापन समिती क्रियाशील करणे गरजेचे आहे. या समितीकडे येणाऱ्या निधीचा विनियोग वणवे रोखण्यासाठी व तो योग्य रितीने करण्यासाठी या समितीला मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. यासाठी वन विभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे.
- जी. एम. पाटील, सरपंच- देवर्डे ग्रामपंचायत.
लोकचळवळ व्हावी
वणवा थांबवा, वन वन्यजीव वाचवा हे अभियान घेण्यात आले. गावागावांत वणवे रोखण्यासाठी लोकचळवळ झाली पाहिजे. वणवे रोखण्यासाठी वन विभाग प्रयत्नशील आहे.
- अमरजित पवार, सह वनसंरक्षक व प्रभारी आजरा परिक्षेत्र अधिकारी.
संपादन - सचिन चराटी
kolhapur
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.