धक्कादायक ः पाचशे क्वारंटाईन लोकांचा जीव टांगणीला

धक्कादायक ः पाचशे क्वारंटाईन लोकांचा जीव टांगणीला

कोल्हापूर ः परगावाहून जिल्ह्यात आलेल्या व्यक्तीचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. यापैकी 27 मेपर्यंत 3 हजार 814 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल येणे प्रलंबित होते. यातील जवळपास 500 व्यक्तींचे स्वॅब अहवाल क्वारंटाईन कालावधी पूर्ण होत आला तरी मिळालेले नाहीत. त्यामुळे या व्यक्ती कोरोना संसर्गित नाहीत, असे समजावे की नाही याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. अशात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रयोगशाळेकडून आजवर 17 हजार 991 अहवाल दिले गेले आहेत. सध्या अहवाल प्रलंबित नाहीत, असा दावा प्रभारी अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे यांनी केला आहे. 
कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असताना नोकरी व्यवसायानिमित्त परगावी असलेल्या व्यक्ती गावी येण्याचे प्रमाणात वाढले. परिणामी गेल्या वीस दिवसांपूर्वी दिवसाला 300 ते 1200 व्यक्तींची तपासणी सर्व शासकीय रुग्णालयात होत होती. यात लक्षणानुसार अनेक व्यक्तींचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या शेंडापार्कातील प्रयोगशाळेकडे पाठवले होते. सुरवातीला एक-दोन दिवसांत अहवाल मिळाले, त्यानंतर मात्र स्वॅबची संख्या वाढू लागली. अशात साडेपाच तासांत 45 स्वॅबचे अहवाल येऊ शकतात. त्यानुसार दिवसभरात शंभर ते दोनशे अहवाल येऊ शकत होते, मात्र मागील आठवड्यात कधी एकेका दिवशी 500 ते 600 अहवाल आले. इतक्‍या वेगाने तपासणी होत असेल तर अन्य स्वॅबचे अहवाल येण्यास 7 ते 12 दिवसांचा विलंब का लागला, हा प्रश्‍न आहे. 
या स्थितीतून इतक्‍या उशिरा स्वॅबची तपासणी केलेली चालते का? हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे. अशात या प्रयोगशाळेत शनिवारी येथे आरएनए एक्‍सब्रेक्‍शनचे नवीन यंत्र आले आहे. त्यामुळे स्वॅब तपासणीला गती येईल, असे सांगण्यात येते. 

अहवाल वेळेत येतील ः डॉ. घोरपडे 
याबाबत प्रभारी अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे यांच्याशी संपर्क साधला त्या म्हणाल्या, ""गेल्या दोन दिवसांत बहुतेक सर्व स्वॅबची तपासणी पूर्ण झाली आहे. स्वॅब तपासणी प्रलंबित राहिलेली नाही. जिल्ह्यातून एका दिवसात 400 ते 500 स्वॅब तपासणीला येत होते. याशिवाय सिंधुदुर्गातून किमान 60 ते 100 स्वॅब येत होते. त्यामुळे प्रलंबित राहिले असतील, पण आता स्वॅबचे अहवाल वेळेत द्यावेत, अशी सूचना केली आहे. त्यामुळे इथून पुढे स्वॅब अहवाल वेळेत तपासणी होऊन येतील. '' 

क्वारंटाईन पूर्ण झालेल्यांना तपासून सोडता येईल ः साळी 
याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी यांना विचारले असता ते म्हणाले, ""स्वॅबची तपासणी जवळपास पूर्ण होत आली आहे. जे स्वॅब शिल्लक आहेत. त्याचीही तपासणी आज पूर्ण होईल, मात्र डाटा एन्ट्री करण्यास तांत्रिक अडचण आहे, हा डाटा एन्ट्री अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. त्यामुळे प्रत्यक्ष अहवाल मिळण्यास विलंब झाला असेल, मात्र हेही काम लवकरच पूर्ण होईल, तर ज्यांचा क्वारंटाईन पूर्ण होत आहे, अशांनी शासकीय डॉक्‍टरांनी तपासणी करून घेऊन कोणतेही लक्षण नसल्यास त्यांना घरी सोडता येईल.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com