कोल्हापूर : लॉकडॉऊन काळातील घरगुती वीज बिले माफ करावीत, या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीतर्फे महावितरणच्या ताराबाई पार्कातील मुख्य कार्यालयाला आज सकाळी साडे नऊ वाजता ताला ठोको आंदोलन करण्यात आले. प्रवेशद्वाराला ताला ठोकताना पोलिस यंत्रणा व कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर अन्य कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारासमोरच ठिय्या मांडला. जोपर्यंत ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांची सुटका होणार नाही, तोपर्यंत प्रवेशद्वारापासून हटणार नाही, अशी त्यांनी भूमिका घेतली. त्यामुळे पोलिस यंत्रणेला ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडावे लागले.
दरम्यान, महावितरणच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली. त्यांना कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारासमोरच अडवले. घरगुती वीज बिले माफ करावीत, यासाठी समितीतर्फे यापूर्वी आंदोलने करण्यात आली. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे सरकारला पुन्हा जागे करण्याच्या उद्देशाने समितीने ताला ठोको आंदोलनाचा निर्णय घेतला. त्यानुसार समितीचे कार्यकर्ते सकाळीच महावितरणच्या प्रवेशद्वारासमोर आले. त्यांनी प्रवेशद्वाराला ताला ठोकून आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी वीज बिले भरणार नाही, वीज बिले माफ झाली पाहिजेत, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
समितीच्या पत्रकात म्हटले आहे की, राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या समवेत १ जुलैला व्हीडीओ कॉन्फरन्सिंद्वारे झालेल्या बैठकीत पेडपेडींग कृषिपंपाच्या वीज जोडण्या सुलभ करण्याकरीता एचव्हीडीएस अंतर्गत वीज जोडण्या देण्याची अट शिथील करुन पूर्वीप्रमाणे लघुदाब वाहिनीवर अथवा रोहित्रावर ज्या ठिकाणी वीज भार उपलब्ध आहे. त्याठिकाणी तत्काळ कृषिपंपाना जोडण्या देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे जाहीर केले होते. त्यांनी सहा महिन्यापूर्वी मागील अधिवेशन काळात याबाबत जाहीर प्रसिध्दपत्रक देखील दिले होते. याबाबतच्या अधिकृत सूचना महावितरण कार्यालयास अजून मिळालेल्या नाहीत. तसेच राज्यातील सर्व लघु दाब पाणी पुरवठा संस्थांचे दर प्रति युनिट 1.16 पैसे करणार, असे देखील ठरले होते. त्याची देखील अंमलबजावणी झाली नाही.
कोल्हापूर जिल्ह्यातील २०१३-१४ पासून साधारण ७५०० शेतकरी पैसे भरुनही महावितरणच्या वीज जोडणीची वाट पाहत आहेत. महावितरणकडून गेल्या पाच वर्षात साधारण २०० ते ३०० वीज जोडण्या कोल्हापूर जिल्ह्यात जोडल्या आहेत. सांगली १२५००, सातारा ३००० तर इतर जिल्ह्यात व राज्यातही अशीच परिस्थिती आहे. राज्यात अंदाजे ४ लाख शेती पंपाच्या जोडण्या प्रलंबित आहेत. यामुळे पाईप लाईन, विहीर व बोअर यांचा खर्च करुन शेतकरी वीज जोडणीपासून वंचित आहे. काही शेतकऱ्यांच्या तर विहीरी वा बोअरवेल्स वेळेत वीज कनेक्शन न मिळल्याने बुजून आहेत. त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. लॉकडॉऊन काळातील घरगुती वीजबिलामध्ये सवलत देऊ, असे जाहीर करुन जवळ जवळ दोन महिने लोटले आहेत. पण, अंमलबजावणी झाली नाही. आंदोलनात वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे, विक्रांत पाटील, बाबा पार्टे, नामदेव गावडे, प्राचार्य टी. एस. पाटील, बाबा इंदुलकर, जनार्दन पाटील, अशोक पोवार, रमेश मोरे, बाबा देवकर, बाळासाहेब भोसले, संदीप देसाई, सहभागी झाले.
संपादन - स्नेहल कदम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.