कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीत मृतदेह आला म्हटलं की त्याला हात लावून सरणावर कोणी ठेवायचे ? असा प्रश्न निर्माण होतो. घरचे हात लावायला कुणी तयार होत नाहीत बाहेरचे तर चार हात लांबच. बरं, इथे काम करणारीही माणसचं आहेत.
त्यांनाही कुटुंब आहे, नातेवाईक आहेत. पण हेच कर्मचारी जीव धोक्यातून घालून गेल्या तीन महिन्यापासून स्मशानभूमीत काम करत आहेत. कोरोनाने एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबातील अंत्यसंस्काराला कुणी येत नाही. मात्र, धोका पत्करून हे 16 कोविड योद्धे अंत्यसंस्कार करतात.
कोरोनाचा प्रादुर्भाव जसा सुरू झाला तसे स्मशानभूमीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोनच बदलून गेला आहे. इथे जाणे म्हणजे कोरोनाची लागण होईल अशा धास्तीपोटी रस्त्यावरून ये-जा करतानाही कुणाचे स्मशानभूमीकडे पाहण्याचे धाडस होत नाही. शहराच्या जुन्या भागातील मृतदेह आल्यानंतर तेवढी गर्दी होते. अर्थात ही गर्दीही चुकीची आहे.
एरव्ही एखाद्याच्या मृत्यू झाल्यानंतर तोबा गर्दी करणारे आता स्मशानभूमीत दूरच संबंधिताच्या घरी जाण्याचेही टाळताना दिसत आहेत. अर्थात सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब योग्य असली तरी स्मशानभूमीतील कर्मचारी कोणत्या स्थितीत काम करतात. हे ही अनुभवायला हवे. मृतदेहापासून आपल्याला इन्फेक्शन होणार नाही याची धास्ती सर्वांना असते. कर्मचारी मात्र हॅण्डग्लोज घालून मृतदेह उचलण्यासाठी तयार असतात. स्मशानभूमी चोवीत तास धगधगत असते. नातेवाईक निघून जातात मात्र मृतदेह नीट जळाला की नाही याची खबरदारीही हे कर्मचारी घेत असतात.
कोरोनाची लागण झालेला मृतदेह आलाच तर परिस्थिती आणखी गंभीर होते. जवळचे कुणी स्मशानभुमीत येत नाही. अंत्यंस्कार तर करावे लागतात. इचलकरंजीच्या एका मृतदेहाबाबत असाच प्रकार निदर्शनास आला. संबंधिताच्या कुटुंबातील अंत्यसंस्कारासाठी कोणी आल्याने कर्मचाऱ्यांनीच अंत्यसंस्कार केले.
16 कर्मचारी तीन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये येथे कार्यरत आहेत. डयुटी संपवून घरी जाताना कर्मचाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. अंघोळ केल्याशिवाय घरी जायचे नाही अशी स्पष्ट सूचना त्यांना दिली गेली आहे. तरीही घरचे काय म्हणतील? शेजारी पाजारी काय म्हणतील? अशा प्रश्नांचे काहूर त्यांच्या मनात उभे राहते. डोक्यावर शेणी घेऊन येणे, नंतर त्या रचणे आणि मृतदेह उचलून सरणावर ठेवणे हे दिसायला सोपे असले तरी प्रत्यक्ष जो हे काम करतो त्यालाच त्याचे गांभीर्य माहित असते. दररोज किमान पंधरा मृतदेहांवर अंत्यसंस्कार होतात. 120 किलो लाकूड, पाचशे शेणी त्यासाठी खर्ची पडतात.
स्मशानभुमीतील कर्मचारी खबरदारी घेऊनच अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पाडतात. कोरोनाने मृत्यू झाला असल्यास त्यासाठी पीपीई कीट घालूनच अंत्यसंस्कार केले जातात. ड्युटी संपल्यानंतर अंघोळ करूनच घरी जावे अशी सूचना दिली गेली आहे. काम आहे म्हंटल्यांवर ते करायलाच हवे. धोका पत्करून तसेच कोणतीही तक्रार न करता कर्मचारी 24 तास अलर्ट आहेत, याचे निश्चितच कौतुक आहे.
- अरविंद कांबळे, आरोग्य निरीक्षक, महापालिका.
दृष्टिक्षेप
- 16 कर्मचारी तीन महिन्यापासून अविरतपणे कार्यरत
- चोविस तास तीन शिफ्टमध्ये करतात काम
- कोरोनानंतर स्मशानभूमीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला
- कोरोनामुळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कारावेळी गर्दीही कमी
- कोरोनाने मृत्यू झाल्यास पीपीई कीट घालूनच अंत्यसंस्कार
- आंघोळ करूनच घरी जाण्याच्या सक्त सूचना
संपादन : प्रफुल्ल सुतार
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.