चंद्रकांत पाटील यांना भूमिकाच नाही; उदय सामंत

Higher and Technical Education Minister Uday Samant uday samant
Higher and Technical Education Minister Uday Samant uday samant

कोल्हापूर : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री म्हणतात, चंद्र, सूर्य असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहणार; मात्र यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कोणतीही भूमिका नाही. यावर ते काहीही भाष्य करत नाहीत. सीमाप्रश्‍नाचे भाजपला काही देणे-घेणे नाही, अशी टीका उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत केली. शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषद झाली.


शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यासाठी मंत्री उदय सामंत काल  कोल्हापुरात आले होते. काळी फीत लावून त्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री सामंत म्हणाले, ‘‘भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कर्नाटक सीमाप्रश्‍नाबाबत कोणतीच भूमिका नाही. तेथे उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हलवला तरी त्यांचे कोणतेही भाष्य नाही. तेथील उपमुख्यमंत्री चंद्र, सूर्य असेपर्यंत बेळगाव आमचेच म्हणतात, पण यावर चंद्रकांत पाटील काही बोलत नाहीत. कर्नाटक प्रश्‍नावर भाजपची कोणतीच भूमिका नाही.

सीमेवर चीनचे सैन्य आत घुसते त्यांना रोखत नाही, पण काळा दिवस कार्यक्रम करण्यासाठी कर्नाटकात जाणाऱ्या मराठीभाषकांना अडवतात. चंद्रकांत पाटील यांना इथे कोणताच जनाधार नाही. निवडणुकीत पडणार, याची माहिती असल्यानेच ते पुण्यातून निवडणुकीला उभे राहिले. सीमाभागातील मराठीभाषकांच्या मागे शिवसेना ठामपणे उभी राहिली. सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी आम्ही शैक्षणिक संकुल उभारत आहोत. या वर्षीपासून तेथे अध्यापन सुरू होईल. यामुळे मराठीभाषक विद्यार्थ्यांना मातृभाषेतून व्यावसायिक अभ्यासक्रम करता येतील.’’ 

तुम्ही तारीख सांगा...
मंत्री सामंत म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकात येऊन दाखवावे, असे आव्हान तिथले उपमुख्यमंत्री स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी देतात. यापूर्वी अनेकवेळा शिवसेनेच्या मंत्र्यांनी बेळगावात जाऊन आंदोलन केले आहे; पण मी कर्नाटक सरकारला आव्हान देतो, तारीख आणि वेळ तुम्ही सांगा; मी व येथील शिवसैनिक कर्नाटकात येऊन दाखवतो. त्यानंतर मग सर्व गोष्टींवर चर्चा करू.’’


सिंधुदुर्गातील दादागिरी संपली
खासदार नारायण राणे यांच्यावर टीका करताना सामंत म्हणाले, ‘‘पूर्वी सिंधुदुर्गात काही जणांची दादागिरी होती. आता तेथे शिवसेना मजबूत झाली आहे. त्यामुळे कोणाची दादागिरी तेथे चालत नाही. ते ‘विद्वान’ आमच्यावर जेवढी टीका करतील तेवढी आमची मते वाढतात. त्यामुळे त्यांनी टीका करावी, आमचा फायदा होईल.’’

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com