
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. सहकारी संस्थांत आहे, त्या संचालक मंडळालाच मुदतवाढ देण्यात आली आहे.
मात्र, राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी योग्य व्यक्तीची निवड होईल, असा शासन निर्णय झाला आहे. मात्र, ही योग्य व्यक्ती कोण, ती ठरणार कशी, कोण ठरविणार, संबंधित व्यक्तीबाबत वाद असतील तर काय, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र, या सर्व प्रक्रियेत ग्रामविकास विभाग व या खात्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांची भूमिका निर्णायक राहील.
जगासह राज्यावर कोरोनाचे संकट आले. मार्चपासून आजपर्यंत कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यामुळे शासनाने सर्व निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. सहकारी संस्थांत जिल्हा दूध संघ, जिल्हा बॅंका, तालुका संघांच्या संचालक मंडळांची मुदत संपली आहे. मात्र, कोरोनामुळे या संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. या संचालक मंडळांनाही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींनाही असाच निर्णय लागू करावा, अशी मागणी होत होती. मात्र, कायद्यातील अडथळ्यांमुळे हा निर्णय झाला नाही.
राज्याच्या ग्रामविकास विभागाने बुधवारी (ता. 1) मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत कायद्यात दुरुस्ती करीत हा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय झाला असला तरी प्रशासकपदासाठी योग्य व्यक्ती कोण, हे आतापर्यंत तरी गुलदस्त्यात आहे. ही योग्य व्यक्ती ठरविण्याचा अधिकार ग्रामविकास विभागाकडे राहील. त्यामुळेच ग्रामविकास विभाग व ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांच्या भूमिकेकडे राज्यातील ग्रामपंचायतींचे लक्ष लागले आहे. प्रशासकाची निवड होत असताना विद्यमान महिला सरपंच असतील तर त्यांच्या पतीची निवड करावी, अशी मागणी होती. तसेच, जर पुरुष सरपंच असेल तर त्याच्या पत्नीची निवड करावी, अशीही मागणी आहे. दुसरीकडे प्रशासकपदाची जबाबदारी त्या मतदारसंघातील जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सदस्यांनाही देण्याची मागणी आहे.
* मुदत संपलेल्या ग्रामपंचायती- 1,566
* जुलै ते डिसेंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती- 12,668
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून निवड केली जाईल. महाराष्ट्र ग्रामपंचायत कायद्यात दुरुस्ती करून हा निर्णय घेतला आहे. मात्र, ही योग्य व्यक्ती कोण, त्याची निवड कशी होणार, याबाबत लवकरच ग्रामविकास विभाग निर्णय घेणार आहे. यासाठी या सर्व ग्रामपंचायतींना वाट पाहावी लागेल.
- हसन मुश्रीफ, ग्रामविकासमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.