कोल्हापूरला महापुराचा विळखा : राधानगरी धरणाचे चार दरवाजे खुले 

kolhapur flood Danger level by Panchganga river Water came near Panchganga Talmi in Kolhapur
kolhapur flood Danger level by Panchganga river Water came near Panchganga Talmi in Kolhapur

कोल्हापूर : गतवर्षीच्या आठवणी अद्याप ताज्या असतानाच आज कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा महापुराचा विळखा घट्ट होत आहे. पंचगंगा नदीने  दुपारी धोक्‍याची पातळी ओलांडली. रात्री बारा वाजता पाणी पातळी ४४.१ फूट होती. रात्री अकरा वाजता पंचगंगा तालमीजवळ पुराचे पाणी पोहोचले होते. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे (क्रमांक ३ व ६) सायंकाळी सात वाजता उघडले. त्यातून २ हजार ८४६ क्‍युसेक आणि वीजनिमिर्तीसाठी एक हजार ४०० क्‍युसेक असे एकूण ४ हजार २५६ क्‍युसेक विसर्ग नदीपात्रात सायंकाळनंतर सुरू झाला आहे.  दरम्यान आणखी दोन स्वयंचलित दरवाजे उघडले. सकाळी आठपर्यंत जिल्ह्यात सरासरी तब्बल ११५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.  

धरणाचे कोणतेही पाणी पंचगंगा नदीमध्ये दुपारपर्यंत न मिसळताच यावर्षी पहिल्यांदा पंचगंगेने महापूर अनुभवला आहे. जिल्ह्यातील पूरस्थिती आणि अतिवृष्टीमुळे एकूण २३ गावांमधील एक हजार ७५० कुटुंबांतील चार हजार ४१३ व्यक्तींचे, तर ११०० जनावरांचे स्थलांतर केल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यातील ३७ मार्ग बंद असून, पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. राधानगरी, पन्हाळ्याकडून कोकणात आणि गगनबावड्यातून कोकणात जाणारे मार्ग बंद झाले आहेत. वारणानगरमार्गे पन्हाळ्याकडे पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. 


गेले तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे. आज पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी शुक्रवार आणि रविवारी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे शहरासह आंबेवाडी, प्रयाग चिखली यासह तालुक्‍याच्या ठिकाणी नदी काठच्या गावांतून नागरिक आणि जनावरांना स्थलांतरित करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास पंचगंगा नदीच्या शिवाजी पुलावर मच्छिंद्री झाली. यामुळे कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग दुपारनंतर बंद झाला. 


दरम्यान, थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोल्हापुरातील पूरस्थितीची माहिती घेतली आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह स्थानिक आमदार, अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना योग्य ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. स्थलांतरासाठी पूर्वी आलेल्या दोन आणि आज आलेल्या दोन अशा एनडीआरएफ तुकड्या नदीकाठच्या गावांकडे रवाना झाल्या. गतवर्षी सर्वाधिक नुकसान झालेल्या आंबेवाडी, चिखलीतील नागरिकांनी जनावरांसह स्थलांतर सुरू केले आहे.


स्थलांतरित केलेले
जिल्ह्यातील २३ गावांतील १ हजार ७५० कुटुंबांतील ४ हजार ४१३ व्यक्तींचे स्थलांतर


गडहिंग्लज- बाधित दोन गावांतील पाच कुटुंबांतील २१ व्यक्ती, १४ जनावरे


पन्हाळा- बाधित दोन गावांतील तीन कुटुंबांतील १४ व्यक्ती, एक जनावर


करवीर- बाधित तीन गावांतील १६०३ कुटुंबांतील ३८५० व्यक्ती आणि १०३८ जनावरे


गगनबावडा- बाधित आठ गावांमधील २१ कुटुंबांतील ६८ व्यक्तींचे स्थलांतर 


आजरा- सुळेरानमधील एका कुटुंबातील ९ व्यक्तींचे स्थलांतर 


चंदगड- बाधित सहा गावांतील ९७ कुटुंबांतील ३७७ व्यक्ती,  ४७ जनावरे


महापालिका क्षेत्रातील २० कुटुंबातील ७४ नागरिक चित्रदुर्ग मठात स्थलांतरित केले. 
जिल्ह्यातील ११०० जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित

जिल्ह्यातील धरणसाठा
आज दुपारी चारच्या अहवालानुसार जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा दशलक्ष घनमीटरमध्ये असा ः तुळशी ६९.९४२, कासारी ६८.४३, कुंभी ६३.५४, पाटगाव ८७.८०
बंधाऱ्यांची पाणी पातळी फुटांमध्ये अशी ः राजाराम ४३, तेरवाड ५५.६, शिरोळ ४९.६, नृसिंहवाडी ४८.


रेडेडोह फुटला...
कोल्हापूर-पन्हाळा रोडवरील आंबेवाडीजवळ रस्त्यावरून कोल्हापूरच्या दिशेने पाणी वेगाने येते. पूर्वी या ठिकाणी रेडा उभा राहिला तरीही पाण्याचा वेग त्यालाही ओढून घेऊन जात होता. येथील पुराच्या पाण्याला रेड्याची ताकद होती. त्यामुळे परिसराला रेडेडोह असे म्हटले जाते. अलीकडेच तेथे जमिनीतून नळांद्वारे पाणी रस्त्याच्या पलीकडे काढले आहे. त्यामुळे येथील पाण्याचा जोर काही प्रमाणात कमी झाला असला तरीही तेथे रेडेडोहाचे पाणी पाहण्यासाठी आजही गर्दी होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास तेथे पाणी आल्यामुळे वाहतूक बंद केली आहे.


दिवसभरातील पाऊस
जिल्ह्यात एकूण एक हजार ३८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सरासरी ११५ मिलिमीटर आहे. आज सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत तालुकावार झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा ः हातकणंगले ः ६५.१३, शिरोळ ४८.४३, पन्हाळा ९९.४३, शाहूवाडी ८८.३३, राधानगरी १५२.१६, गगनबावडा २४३.००, करवीर ११५.३६, कागल १२९.५७, गडहिंग्लज ६५.५७, भुदरगड ८९.००, आजरा १४४.५०, चंदगड १४५.१७

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com