नवी पिढी कधी जाणणार कोल्हापूरचा वारसा !

नवी पिढी कधी जाणणार कोल्हापूरचा वारसा !
Updated on

कोल्हापूर : फार जवळ गेलं की, त्या वस्तूच सौंदर्य किंवा महत्त्व फार प्रकर्षाने जाणवत नाही, असे म्हणतात. नेमकी तीच परिस्थिती कोल्हापूर परिसरातील जुन्या वास्तू व वारसा स्थळांच्या वाट्याला आली आहे. ऐतिहासिक व प्राचीन वारसा असलेल्या अनेक वास्तूंबद्दल कोल्हापूरकरांना फारसे गांभीर्य नसल्याने या वस्तूंचे महत्त्व इतिहासाच्या पानातच बंद राहिले आहे. 

कोल्हापुरातील जुन्या राजवाड्याच्या परिसरास मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. कोल्हापूर संस्थानच्या राजधानीचे मुख्य ठिकाण. खुद्द ताराराणी महाराणींनी स्थापन केलेली या संस्थानची गादी. पण, आपण कोल्हापूरकर केवळ ताराराणीच्या जयजयकारात पुढे. प्रत्यक्षात या परिसराची जपणूक करण्यात काय केले हे शोधायची वेळ आता आली आहे. हा जुन्या राजवाड्याचा परिसर 1857 च्या उठावाचा साक्षीदार आहे. या राजवाड्याच्या परिसरास उठावाचा इतिहास झाला आहे. चिमासाहेब महाराज, फिरंगोजी शिंदे व अन्य सहकाऱ्यांच्या जीवाची बाजी त्यासाठी लागली आहे. उठावात सहभागी असलेल्यांना या राजवाड्याच्या परिसरात गोळ्या घालून ठार मारल्याचा क्रांतिकारी इतिहास आहे. पण बाहेरचे पर्यटक राहू दे, किती कोल्हापूरकरांना जुन्या राजवाड्याच्या हा इतिहास माहीत आहे? त्यामुळे वारसास्थळ दिनाच्या निमित्ताने हा इतिहास अगदी व्यवस्थितपणे नव्या पिढीला समजावण्याची गरज आहे. 
याशिवाय अंबाबाई मंदिराला मोठे धार्मिक अधिष्ठान आहे. मंदिरावरचे शिल्पकला म्हणजे सौंदर्य आविष्कारच आहे. या अंबाबाई मंदिराचा विकास आराखडा हा शब्द ऐकून ऐकून बोथट झाला आहे. 
अंबाबाई मंदिराचा विकास होणार हे ऐकत ऐकत पिढी संपून गेली आहे. या क्षणीही विकासाचा आराखडा कोणीही सांगू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. या मंदिरापेक्षा अन्य कोणताही प्राचीन वारसा कोल्हापुरात नाही. पण अंबाबाई मंदिर जसे आहे. तसेच आहे. त्याचे संवर्धन कागदावरच आहे. 
कोल्हापूरचे शाहू खासबाग कुस्तीचे मैदान म्हणजे कुस्तीचा चालताबोलता वारसा. पण हे कुस्ती मैदान पहायला एक पर्यटक येत नाही. किंबहुना पर्यटकांना कोणी या मैदानाकडे घेऊनच जात नाही. त्यामुळे कुस्तीचा वारसा वर्षानुवर्षे मोकळा पडला आहे. तो जपायचा कसा आणि कोणी हाच खरा प्रश्न आहे. शाहू स्टेडियम जवळ साठमारी आहे. या साठमारी मैदानात उन्मत्त हत्ती सोडलेला असायचा आणि त्याला डिवचून डिवचून बेजार केले जायचे. अशा वेळी एखादा त्या हत्तीच्या तडाख्यात आला की, त्याचा मृत्यू ठरलेला असायचा. पण, हा साहसी खेळ कोल्हापूरकरांनी जपला. हे मैदान आजही आहे. पण, त्याचा इतिहास नव्या पिढीला खूप कमी माहिती आहे. या नव्या पिढीला जर हा इतिहास समजला नाही तर त्याच्या पुढच्या पिढीला साठमारी म्हणजे काय हे माहीतच नसणार आहे. पंचगंगा नदीचा घाट हा वारसा स्थळाचा महत्त्वाचा भाग आहे. शहरालगत असलेल्या या नदीचा घाट पूर्वजांनी बांधून ठेवला म्हणून बरे झाले आहे. कारण गेल्या काही वर्षात पंचगंगा घाट विकास योजना केवळ कागदोपत्री चर्चेतच आहे. एक नवा दगड घाटावर बसलेला नाही, अशी परिस्थिती आहे. 

शाहू जन्मस्थळाचे जतन कधी होणार 
शाहू जन्मस्थळ सर्वात महत्त्वाचे वारसा स्थळ. पण आणखी किती वर्षे त्याचे जतन व संवर्धन चालणार हा कोल्हापूरकरांसमोरचा प्रश्न आहे. कारण गेली तीस वर्षे या शाहू जन्मस्थळाचे जतन व संवर्धन चालू आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com