कोल्हापूर - वर्षाअखेरपर्यंत कोल्हापूर विमानतळावर एअरबस ३२० सारखी मोठी विमानेसुद्धा उतरू शकतील. यासाठी आवश्यक ते सहकार्य करू, तसेच इतर विमानसेवाही सुरू होतील, असे पत्र केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांना दिले.
काही दिवसांपूर्वी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी कोल्हापूर विमानतळ हे कार्गो हब म्हणून विकसित व्हावे. एअर बस ३२० सारखी विमाने उतरू शकतील, असे अत्याधुनिक काम झाले पाहिजे, अशी मागणी केली होती. कोल्हापूर ते गोवा, पुणे, शिर्डी आणि अहमदाबाद अशी विमानसेवा सुरू करावी, या मागणीला आज केंद्रीय मंत्र्यांनी लेखी उत्तर पाठवले आहे. त्यात त्यांनी हे आश्वासन दिले आहे.
मंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे, येत्या डिसेंबर २०२० पर्यंत मोठी विमाने उतरण्यासाठीच्या सर्व त्या पायाभूत सुविधा पूर्ण केल्या जातील. मागणीनुसार कोल्हापूर विमानतळ हे कार्गो हब झाले पाहिजे, औद्योगिक उत्पादने तसेच शेतीतील उत्पादनांना थेट विमानाने बाहेर पोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील. कोल्हापूरचा त्या दृष्टीनेही अभ्यास करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. कोल्हापूर ते गोवा, पुणे, शिर्डी आणि अहमदाबाद अशा फेऱ्या सुरू झाल्या पाहिजेत, या मागणीला सुद्धा संबंधित विभागाकडे पाठवले आहे, ते सुद्धा विचाराधीन आहे असे सांगितले.
उत्पादनाच्या वाहतूक केंद्राची मागणीही मान्य
संभाजीराजेंनी मंत्र्यांच्या या सकारात्मक भूमिकेवर समाधान व्यक्त केले. कोल्हापूरकरांच्या मागणीला मंत्र्यांनी प्राथमिकता दिली. कोल्हापूरचे विमानतळ हे केवळ प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने न बघता औद्योगिक, व्यापारी आणि शेती उत्पादनांचे वाहतूक केंद्र बनावे, अशी माझी मागणी होती. ती सुद्धा त्यांनी मान्य केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.