''शेतकरीच भाजपला पायातील हातात घेवून उत्तर देतील''

minister hasan mushrif criticism on bjp leader chandrakant patil
minister hasan mushrif criticism on bjp leader chandrakant patil

कोल्हापूर : केंद्र सरकार हे शेती कायद्यात कदापिही बदल करणार नाही, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे. अशी घोषणा करणारे चंद्रकांत पाटील हे काय देशाचे पंतप्रधान आहेत की कृषीमंत्री, असा सवाल करत श्री.पाटील यांनी आगीत तेल ओतण्याचे काम करु नये, असा सल्ला राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. तर हिंम्मत असेल तर भाजपने शेतकऱ्याच्या बांधावर जावून हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे पटवून द्यावे, शेतकरीच त्यांना पायातील हातात घेवून उत्तर देतील, असा टोला पालकमंत्री सतेज पाटील यांनी लावला. तसेच मंगळवारी (ता.8) शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या संपात सहभागी होत कडकडीत बंद पाळावा. असे आवाहनही दोन्ही मंत्र्यांनी केले. 

ना. मुश्रीफ म्हणाले, केंद्राने शेतकरी विरोधी कायदा केला आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत ऐन कडाक्‍याच्या थंडीत शेतकऱ्यांना देशव्यापी आंदोलन सुरु केले आहे. कधी नव्हे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी चर्चेची तयारी दर्शवली आहे. केंद्रिय मंत्री अमित शहा व कृषी मंत्री तोमर हे शेतकऱ्यांशी चर्चा करत आहेत. मात्र हे शेतकरी सरकारचा चहा देखील प्यायला तयार नाहीत. शेतीचे कंत्राटीकरण करुन या शेत जमिनी कवडीमोल भावाने अदानी, अंबानीच्या घशात घालण्यासाठी हे कायदे केले असल्याचा आरोप ना. मुश्रीफ यांनी केला. या कायद्यांना विरोध करण्यासाठी देशव्यापी बंद पाळण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष या बंदमध्ये सहभागी झाले असून सर्वांनी शांततेत बंद पाळावा, असे आवाहन ना.मुश्रीफ यांनी केले. 

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा यांनी शेतकरी कायदे रद्द केले जाणार नाहीत, अशी भूमिका मांडली आहे. यातून भाजप किती शेतकरी विरोधी आहे, हेच स्पष्ट झाले आहे. बड्या उद्योगपतींच्या हितासाठी हे कायदे करण्यात आले आहेत. अंबांनींच्या रिलायन्ससाठी बीएसएनएल कंपनी देशोधडीला लावण्यात आली आहे. याच पध्दतीने शेतकऱ्यांची अवस्था होणार आहे. इचलकरंजीत सूत व्यापारी जशी कारखानदारांची फसवणूक करतात तसाच प्रकार शेतीत होणार आहे. त्यामुळेच या कायद्यांना कॉंग्रेसने विरोध केला असल्याचे ना.पाटील यांनी सांगितले. 

 शेतकऱ्यांना समर्थन करण्यासाठी सर्वांनी शेती, बांध व घरावार काळा झेंडा लावा. मोबाईल डिपीवर निषेधासाठी काळा स्टेटस ठेवा. केंद्र सरकार हे विरोधाला नाही पण सोशल मीडियाला घाबरते. त्यामुळे सोशल मीडियातून शेतकरी आंदोलनाचे समर्थन भाजपच्या धोरणांना विरोध करा. अत्यावश्‍यक सेवा वगळून एक दिवस व्यापारी, शेतकरी, एस.टी.वाहूतक व्यवस्था यांनी बंद पाळा आणि शेतकऱ्यांचे समर्थन करा. हे करत असताना कायदा व सुव्यवस्थेची खबरदारी घ्या. 
- ना.सतेज पाटील, पालकमंत्री


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com