"अन्यथा भविष्यात बेरोजगार पिढी दगड हातात घेऊन व्यवस्थेच्या विरोधात उभी राहील"

National General Secretary of All India Maratha Federation Rajendra Kondhare press conference kolhapur
National General Secretary of All India Maratha Federation Rajendra Kondhare press conference kolhapur

कोल्हापूर : मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा एवढेच ध्येय न बाळगता अनेक क्षेत्रातील संधींकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करत मराठा समाजातील गर्भश्रीमंत व उच्च मध्यमवर्गीय घटकांनी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याची भूमिका स्वीकारावी. अन्यथा भविष्यात हाताला रोजगार नसलेली पिढी दगड हातात घेऊन व्यवस्थेच्या विरोधात उभी राहील, असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला. 

श्री. कोंढरे म्हणाले, "राज्य शासनाने राज्यसेवा पूर्व परीक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव व मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर पुढे ढकलण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. या परीक्षेकरिता सुमारे दोन लाख ६२ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्यापैकी एसईबीसीमधून अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडा ४२ हजार इतका आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुले स्पर्धा परीक्षांकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. बारावीला १२ लाख तर नववीला १४ लाख विद्यार्थी परीक्षा देत असल्याची आकडेवारी सांगते. त्यातही राज्य शासनाची वेळोवेळी भरती होत नाही. अनुशेषात घोटाळे आहेत. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांचे मार्गदर्शक व अधिकारी वर्ग विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने दाखवत आहेत. त्यातून विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची क्षमता आहे त्यांनी ती जरूर द्यावी. इतर विद्यार्थ्यांनी अन्य क्षेत्रांचा पर्याय शोधावा."

ते म्हणाले, "मराठवाडा व विदर्भात मराठा समाजाचे ४६ टक्के प्रमाण आहे. मराठवाड्यात रस्ते, रेल्वे, वीज, पाणी प्रश्नाची समस्या आहे. उस्मानाबाद व बीड येथील मुले पुण्यात टॅक्सीचालक म्हणून काम करत आहेत. त्यात ७० टक्के चालक मराठा समाजाचे आहेत. ऊस तोडणी कामगारांत मराठा समाजाचे प्रमाण २९ टक्के आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. राज्यात कौशल्य विभाग, सारथी, महाज्योती, अमृत, बार्टी, टीआरटी अशा प्रत्येक प्रवर्गाच्या संस्था कार्यरत आहेत. या संस्थांची कार्यक्षमता वाढवून तेथून युवकांच्या स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानात मोठे बदल घडत असून, येत्या काही वर्षात मनुष्यबळ कमी होणार आहे. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णयात काही बदल केल्यास समाजातील विद्रोह कमी होईल."

गर्भश्रीमंत मराठा कुटुंबात छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराज यांच्या प्रतिमा असतात. या महापुरुषांचा  गुणात्मक वारसा त्यांनी चालवण्याची आवश्यकता आहे. आर्थिक दुर्बल मराठा समाजावरील शोषण दूर करण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा. त्यांच्याशी नाळ घट्ट ठेवायला हवी, असेही श्री. कोंढरे यांनी सांगितले.


संपादन -अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com