नेर्ले (सांगली) : ग्रामीण भागातल्या मुली व महिला सुरक्षित आहेत का? वयात आलेल्या मुलींना संरक्षण देणारी यंत्रणा जर कुचकामी ठरत आहे. वरिष्ठांनी लक्ष देऊन अजून ही यंत्रणा सक्षम करणे गरजेचे आहे. वासनांधता, व्यसनाधीनता आणि गावपुढाऱ्यांची दुबळी भूमिका या घटनांसाठी पुरेशी आहे. महिलांच्या बाबतीत घडणाऱ्या घटना पोलिसांनी अग्रक्रमाने सोडवायला हव्यात.
वाळवा तालुक्यात नेर्लेत एका १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केली याचे कारण दोन दिवस कळले नाही. परंतु व्यसनाधीनता व वासनेची शिकार झालेल्या ‘त्या मुलीस’ न्याय मिळणार का ? याकडे लक्ष लागले आहे. संबंधित संशयित युवकाच्या वासनेला बळी पडून तिने घाबरून आपलं आयुष्य संपवल. याला व्यसनाधीनता देखील कारणीभूत आहे. नुकतीच आयुष्याची सुरवात केलेली ती ‘कळी’ भावनाशून्य असलेल्या समाजव्यवसस्थेची बळी ठरली. याला समाजव्यवस्था, प्रशासन व पोलिस यंत्रणा यांनी यांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
काळमवाडी येथील प्रेम प्रकरणातून एका विवाहित महिलेचे वाघवाडी येथील एका युवकाने अपहरण केले. त्याच्या नातेवाईकासह युवकाने रात्रभर मारहाण करून तिला विषारी औषध पाजले व रानात सोडून दिले. पाणी सुद्धा त्या महिलेला मिळाले नाही. सांगली येथील सिव्हिलमध्ये तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला. मृत्यूनंतर तिच्या पतीला प्रेत ताब्यात घ्यावे लागले अशा एक ना अनेक घटना घडत आहेत. यंत्रणेचा वचक आणि धाक संपला आहे.
नेर्ले येथील घडलेली ही आत्महत्या विचार करायला लावणारी आहे. या घटनेचा निषेध करण्याचे धाडस कोणीच केले नाही हे दुर्दैव आहे. त्या संशयित आरोपींना अटक झाली. शेजारीपाजारी महिलावर अनन्वित अत्याचार घडत असतात. परंतु याकडे समाज म्हणून आपले दुर्लक्ष या घटनाना खतपाणी घालते का ? याचा विचार पोलिस, प्रशासन व राजकीय नेत्यांनी, सामाजिक संघटनांनी करायला हवा. राजकीय डावपेचात आपली समाज म्हणून भूमिका महत्त्वाची आहे. हाथरस असो व निर्भया मुलीचा मृत्यू हा ठरलेला आहे आणि त्यानंतर जागी होणारी व्यवस्था काय कामाची ? असा सवाल आहे.
संपादन - स्नेहल कदम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.