आजरा : शिरसंगी व पेरणोली (ता. आजरा) येथे गव्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. गव्यांचे कळप भाताचे तरवे, रोप लावण केलेले भात फस्त करीत आहेत. शिरसंगी येथे कळपाने वीस एकरातील भात शेतीचे सुमारे दीड लाखांचे नुकसान केले आहे. पेरणोली येथे भात व नागलीचे नुकसान केले आहे. यामुळे शेतकरी त्रस्त असून गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वनविभागाकडे केली आहे.
सिरसंगी येथे गावाजवळ मशार नावाचे शेत आहे. शुक्रवारी भात पिकात धुडगूस घातला. रोपलावण तुडवून टाकली. विठ्ठल चौगुले, मारुती चौगुले, मसनू कुंभार, अजित देसाई, सतीश कुंभार यांचे नुकसान झाले आहे. या शेताजवळ वनविभागाची हद्द आहे. यामध्ये वनविभागाने वेळूची निर्मिती सुरू केली आहे. त्यामुळे वन्यप्राणी शेतात घुसून नुकसान करीत आहेत. त्यामुळे वनविभागाने वनहद्दीला तारेचे कुंपण करावे, अशी मागणीही केली आहे.
पेरणोली येथे मध्यरात्री पिंपळाचा सरवा नावाच्या शेतातील बाळासाहेब कांबळे, भरत सावंत, पांडुरंग लोंढे, दत्तात्रय सावंत, शंकर सावंत, बाळासाहेब सावंत यांच्या भात रोप लावणीचे नुकसान केले आहे. बोरीचा सत्या नावाच्या शेतातील तातोबा जोशीलकर, निलम जोशीलकर यांचा तरवा व नागलीचे लव्हे फस्त केले. टेक नावाच्या शेतातील काही शेतकऱ्यांचे नागलीचे लव्हे फस्त केले आहेत. गव्यांचा कळपाचा बंदोबस्त करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.