अबब... कोणत्या दोन तालुक्यांमध्ये 8350 ठिकाणी क्वारंटाईन व्यवस्था?

अबब... कोणत्या दोन तालुक्यांमध्ये 8350 ठिकाणी क्वारंटाईन व्यवस्था?

कोल्हापूर : मुंबई, पुणे या रेडझोनमधून कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्‍यात आणखी किमान 11 हजार लोक येतील. अर्थात, त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होईल, अशी शक्‍यता गृहित धरून शाहूवाडी तालुक्‍यात तब्बल चार हजार 850 आणि पन्हाळा तालुक्‍यात तीन हजार 500 ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाईनची व्यवस्था केली आहे. म्हणजे या दोन तालुक्‍यांसाठी आठ हजार 350 ठिकाणे शासनाने ताब्यात घेतली आहेत. यासाठी आंबा येथील रिसॉर्टस्‌, तालुक्‍याच्या मुख्य गावातील शाळा, समाजमंदिरे, सार्वजनिक हॉल्स्‌, मंगल कार्यालये ताब्यात घेतली आहे. यासाठी तालुक्‍यात युद्धपातळीवर यंत्रणा सज्ज झाली आहे. 

जिल्ह्यात आज 378 हून अधिक कोरोना रुग्ण आहेत. यातील 102 शाहूवाडी तालुक्‍यातील आहेत. अर्थात हे सर्वजण रोजगार, व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत होते. मुंबईतील कोरोनाच्या संसर्गाची व्याप्ती पाहून ते "गड्या, आपला गाव बरा' म्हणून 23 हजार लोक शाहूवाडी तालुक्‍यात आले. मात्र त्यापैकी 102 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. 23 हजार लोकांपैकी 102 जणांना कोरोना संसर्ग हा आकडा तसा कमी आहे; पण एका तालुक्‍यात 102 जणांना कोरोना संसर्ग हा आकडा गंभीर आहे. 

जिल्ह्यात शाहूवाडी, गगनबावडा, भुदरगड, राधानगरी, आजरा, चंदगड या तालुक्‍यातील अनेक लोक मुंबईत आहेत. कोरोना संसर्गाचा विळखा घट्ट होऊ लागल्यानंतर या लोकांनी मुंबई सोडून गावाकडे परत जाण्याचा निर्णय घेतला. खासगी वाहने, प्रवासी बस करून हे लोक जथ्थ्याने कोल्हापुरात आले; मात्र शाहूवाडी तालुक्‍यातील 102 जणांना मुंबईतून येताना कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. मुंबईहून येणारा सोबत कोरोना घेऊनच येतो, असे वातावरण तयार झाले. अशातच बाहेरून आलेले 378 जण कोरोनाबाधित असल्याने हे वातावरण अधिक गडद झाले. त्याने मुंबई, पुणे किंवा रेड झोनमधून येणाऱ्यांना कोल्हापुरात प्रवेश बंद करावा लागला. 

आता आणखी तीन, चार दिवसांनी रेड झोनमधून येणाऱ्यांना प्रवेश खुला केला जाणार आहे. अर्थात मुंबईहून येणाऱ्यांची व त्यातही शाहूवाडी तालुक्‍यात जाणाऱ्यांची संख्या मोठी असणार आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रत्येकाचा स्वॅब तपासणीसाठी घेतला जाणार आहे. अहवाल येईपर्यंत त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करावे लागणार आहे. तालुक्‍यात मोठ्या संख्येने मुंबईहून येणाऱ्यांची व्यवस्था करण्यासाठी सर्व सुविधा द्यावा लागणार आहेत. त्यासाठी प्राथमिक, माध्यमिक शाळा, सार्वजनिक हॉल, समाजमंदिरे, रिझॉर्टस्‌ अशी चार हजार 850 ठिकाणे ताब्यात घेतली आहेत. 

हे पण वाचा - डॉ. रामानंद यांच्या नियुक्तीला विरोध केल्यास आमच्याशी गाठ ! राजेश क्षीरसागर यांचा इशारा
""मुंबईत येणाऱ्यांमध्ये मूळ शाहूवाडीचे लोक अधिक आहेत. सगळे कोरोना बाधित नाहीत; पण सर्वांची आरोग्य तपासणी, क्वारंटाईन व्यवस्था करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी तालुक्‍यात महसूल, आरोग्य, पोलिस, शिक्षक, आशा कर्मचारी असे 4800 जण सज्ज आहेत. आणि हे एक शासकीय काम नव्हे; तर सामाजिक जबाबदारीचे आव्हान म्हणून पूर्ण करणार आहे.'' 
- बी. आर. माळी, प्रांत शाहूवाडी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com