आणखी चार दिवस परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार 

Rain for another four days
Rain for another four days

कोल्हापूर : जिल्ह्यात परवा (ता. १०)पासून परतीच्या पावसाने जोरदार सुरवात केली आहे. काल दुपारपासून शहरासह इतर ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. आणखी चार दिवस परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस आहे. त्यामुळे राधानगरी धरणातून १२०० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होतोय. तर, चिकोत्रा, चित्री, जांबरे मध्यम प्रकल्प, जंगमहट्टी मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

पंचगंगा नदीवरील इचलकरंजी हा बंधारा पाण्याखाली आहे. 
परवा दुपारी एक वाजून ३३ मिनिटांनी सूर्याने चित्रा नक्षत्रात प्रवेश केला आहे. यामुळे जोरदार पाऊस होईल, असा पर्जन्य अंदाज होता. त्यानुसार कालपासून जोरदार वारा व विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. 

दरम्यान, जिल्ह्यात भात कापणी, सोयाबीन व भुईमूग काढणीला हा पाऊस मारक ठरणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, हातकणंगले व करवीर तालुक्‍यातील काही भागात जोरदार पाऊस झाला. खळ्यावर मळलेले भात पावसापासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली. पावसामुळे मळलेले भात भिजले आहे. सोयाबीन काढण्यासाठीही मोठा अडथळा आला. भूईमुग शेंगा भिजल्या तरीही त्याला फारसा परिणाम होणार नसल्याचे चित्र आहे. पण, शेंगा जास्त वेळ पाण्यात भिजल्या तर मात्र फटका बसेल.  

ढगफुटीसदृश पाऊस 
गडहिंग्लज : सलग दुसऱ्या दिवशी आज गडहिंग्लज शहर आणि तालुक्‍यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झाला. काळभैरी रोडवरील शेंद्री तलाव यापूर्वीच भरला असून, रविवारच्या पावसाने तलावातील जादाचे पाणी पुलावर आले होते. यामुळे काही वेळ गडहिंग्लज-काळभैरी मंदिर मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. रविवारी सकाळपासून ऊन आणि ढगाळ वातावरण होते. दुपारी तीननंतर पावसाला प्रारंभ झाला. सुरवातीला तुरळक असणाऱ्या पावसाने मध्यंतरी विश्रांती घेतली. परंतु, पुन्हा सायंकाळी साडेपाचनंतर जोरदार पावसाला सुरवात झाली. काळभैरी डोंगर परिसरात तर ढगफुटीसदृश पाऊस झाला. यामुळे डोंगराच्या पायथ्याला असलेल्या शेंद्री तलावात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली. परिणामी, मुख्य मार्गावरच्या पुलावर पाणी आले. त्यातूनच वाहतूक सुरू होती. जोरदार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले.

घुणकी परिसरास झोडपले
घुणकी : काल दुपारपासून पुन्हा पावसाने झोडपण्यास सुरवात केल्याने काढणीस आलेल्या खरिपाचे काय होणार, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. काल (ता. १०) दुपारी, रात्री, रविवारी पहाटे आणि दुपारपासून पावसाच्या माऱ्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शेतात पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्यांना कोणतीही कामे करता आली नाहीत. भुईमूग, भात, सोयाबीन या पिकांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे.


जाखलेचा पाझर तलाव भरला
कोडोली : जाखले (ता. पन्हाळा) येथील पाझर तलाव जोरदार पावसाने १०० टक्के भरला आहे. जलयुक्त शिवार योजनेतून लोकवर्गणी व शासनाच्या विविध योजनांतून केलेल्या कामाला पोच पावती मिळाली. जाखले येथील गावकऱ्यांनी जोतिबा डोंगर माथ्यावर पडणाऱ्या पावसामुळे येणारे पाणी अडवून जाखले कुराणात सिमेंट बंधारे, लूज बोल्डर, मातीनाल बंधारा, समतल चर, वनतळी तसेच जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती तीन वर्षांपूर्वी केली होती. आता परतीच्या पावसाने चांगलाच जोर धरल्याने पाझर तलाव १०० टक्के भरले असून, सांडव्यातून पाणी बाहेर पडू लागले आहे. जाखले गावाचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याने नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे.


संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com