महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर कोल्हापुरात पावसाला दमदार सुरुवात ; राजाराम बंधारा झाला ओव्हर फ्लो....

Rains continued yesterday and today in the kolhapur district  Increase in water level of rivers in the district including Panchganga
Rains continued yesterday and today in the kolhapur district Increase in water level of rivers in the district including Panchganga

कोल्हापूर : जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे चिंतेत असलेला बळीराजा पुन्हा पाऊस झाल्याने सुखावला आहे,  जिल्ह्याच्या सर्वच भागात सर्वदूर पाऊस सुरू झाल्याने पंचगंगेसह जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.  पंचगंगा नदीवरील कसबा बावडा येथील राजाराम बंधारा आज सकाळी तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला. या बंधाऱ्यात सुमारे तीन फूट पाणी होते, या पाण्यातून काही नागरिक धोकादायकरित्या चालत येताना दिसत होते.


दरम्यान गेल्यावर्षी तीन ऑगस्टला पावसाने सुरुवात केली. सलग नऊ दिवस केवळ कोल्हापूरच नव्हे तर सांगली सातारा जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. कोल्हापुरात तर पावसाने दाणादाण उडवून दिली होती. जनजीवन पूर्ण विस्कळीत झाले होते आज पहाटे पासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे गेल्या वर्षीच्या आठवणी ताज्या झाल्या.


शहरासह जिल्ह्यात काल आणि आज पावसाची रिपरिप सुरूच राहिली आहे. काल दिवसभरात राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी दोन फुटांनी  वाढली होती. रात्रभर पाऊस सुरूच राहिल्याने आज सकाळी तो तिसऱ्यादा ओव्हरफ्लो झाला. तरीही त्यातून धोकादायक वाहतूक सुरू होती.  गेली महिनाभर बळीराजा आभाळाकडे नजर लावून होता. भुईमूग, भात, या सह इतर पिकांसाठी पाऊस महत्वाचा होता. पाऊस झाला नसता तर उत्पन्नावर परिणाम झाला असता अत्ता पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे.

राधानगरी धरणाची पातळी वाढली
राधानगरी  तालुक्‍यातील तिन्ही धरण क्षेत्रांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने धरणातील पाणी झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात ९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणाची पातळी पाऊण फुटाने वाढली आहे. आजमितीस ५.७० टीएमसी म्हणजे ७० टक्के साठा झाला.


पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर तालुक्‍यात आज जोरदार पावसाने हजेरी लावली. दाजीपूर परिसरात आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार सुरवात असून, अतिवृष्टीची नोंद झाली. ९३ मिलिमीटर इतका पाऊस गेल्या २४ तासांत झाला असून, यामुळे धरणाची पाणी पातळी वाढत आहे. राधानगरी येथे ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. राधानगरीसह दूधगंगा व तुळशी जलाशयांच्या पातळीत वाढ होत आहे.

तुळशी ५८ टक्के भरले
धामोड येथील तुळशी जलाशय ५८ टक्के भरले आहे. सध्या ६०७.७५ मीटर इतकी पातळी असून, आजअखेर १११६ मि.मी. पाऊस पाणलोट क्षेत्रात झाला आहे. गतवर्षी पाणलोट क्षेत्रात २१७५ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. जलाशयाची ३.४७ टीएमसी क्षमता आहे. गतवर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. जलाशयात ५८ टक्के साठा आहे. शेजारचा केळोशी येथील लोंढा नाला प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, उजव्या कालव्यातून विसर्ग तुळशी जलाशयात येत आहे. गेल्या २४ तासांत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

आजरा तालुक्‍यात पावसाला सुरवात
आजरा  तालुक्‍यात आज सकाळपासून पावसाच्या सरी कोसळल्या. गेले वीस दिवस दडी मारलेल्या पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी राजा सुखावला आहे. काही गावांत भात व ऊस पीक करप्याचा प्रादुर्भाव झाला. पिकांच्या भरभराटीच्या काळात पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी अडचणीत आला. अशा पार्श्‍वभूमीवर पावसाने सुरवात केल्याने शेती क्षेत्रात चैतन्याचे वातावरण पसरले आहे. 

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com