कोल्हापूर : कोरोनाचे संकट, मनुष्यबळाचा अभाव या संकटांवर मात करत यंदा जिल्ह्यातील जवळपास 25 वर गुऱ्हाळघरे सुरू झाली. सध्या गुळाची आवक सुरू झाली असून, यात 4500 ते 5500 असा दर 10 किलोच्या रव्यांना मिळत आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा एक हजार ते 500 रुपयांनी गुळाला दरवाढ मिळत आहे. त्यामुळे यंदाचा गूळ हंगाम उत्पादकांना समाधानकारक दर मिळेल, असा अंदाज आहे.
जिल्ह्यात दहा वर्षांत गूळ उद्योग धोक्यात आल्याचे चित्र आहे. मध्यंतरीच्या काळात गूळ उत्पादन बंद पडते की, काय अशी स्थिती होते. यात गतवर्षी महापूर आला. त्यामुळे बहुतांशी ऊस व गुऱ्हाळघरांचे पुरात मोठे नुकसान झाले. हंगाम लांबला. कामगारांच्या टोळ्या कमी आल्या. त्यामुळे गत हंगामात गूळ उत्पादन जेमतेम झाले.
यंदाच्या कोरोनाचे संकट आले, पाच महिने लॉकडाउनचा काळ होता. अशात गुऱ्हाळघरे सुरू होतील की, नाही अशी शंका होती यात पूर येऊन गेला; मात्र अपवाद वगळता फारसे नुकसान झाले नाही.
कामगारांच्या टोळ्या कोल्हापूर जिल्ह्यात ऊस तोडणी व गुऱ्हाळघरांवर कामासाठी येत आहेत. जवळपास 25 हजार कामगार सध्या कोल्हापुरात आले आहेत. पुढे महिन्यात आणखी गुऱ्हाळघरे सुरू होतील. शाहू मार्केट यार्डात दहा-बारा अडत्यांकडे सध्या रोज दोनशे ते दोन हजार रव्यांची आवक होत आहे. यात 10 किलोच्या रव्यांना 4500 ते 5 500 असा दर मिळत आहे.
गूळ दर असे : ( 26 सप्टेंबरअखेर सौदा)
स्पेशल गूळ -4954 ते 5400 रूपये
*प्रथम श्रेणी गूळ - 4305 ते 4890 रूपये
*व्दितीय श्रेणी गूळ - 4300 ते -4050 रूपये
*तृतीय श्रेणी गूळ - 3405 ते 3800रूपये
""यंदाचा हंगाम सुरू झाला, दरही चांगला आहे. शेतकऱ्यांनी पिवळ्या रंगाचा गुणवत्ता पूर्ण गूळ बनवावा. चांगल्या मालाचा उठाव चांगला होऊन दर चांगला मिळतो. कोल्हापूर गुळाचा लौकीक टिकून आहे. त्याला साजेशी गूळनिर्मिती झाल्यास शेतकऱ्यांचाही लाभ होऊन हंगाम चांगला होईल, अशी अपेक्षा आहे.''
- नीलेश पटेल, गूळ व्यापारी.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.