पोलिस कमिशनरांच्या  ई-मेल अॅड्रेसवर धक्कादायक इमेल आला अन्...

special story on crime
special story on crime

पुणे हे सांस्कृतिक शहर आहे. गणेशोत्सव हा पुणेकरांचा जिव्हाळ्याचा विषय, पुणे शहर मोठ्या आकर्षक मंगलमय गणेशमूर्तीनी व्यापलेलं होतं. बाप्पाच्या आगमनामुळे सर्वत्र आनंदमय व चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. अशा प्रसंगी प्रशासनावरही कायदा व सुव्यवस्था संभाळण्याची खूप मोठी जबाबदारी असते. साळवे साहेब पुणे कमिशनर ऑफीसच्या सायबर क्राईम सेलमध्ये कार्यरत होते. एका संध्याकाळी पुणे पोलीस कमिशनर यांच्या  ई-मेल अॅड्रेसवर धक्कादायक इमेल आला. साळवे साहेबांनी तो मेल वाचून पाहिला. मेल ला "मिशन अटॅक" असे शीर्षक होते. त्यापुढे "गणेशोत्सवामध्ये बॉम्ब ब्लास्ट करणार आहे;if you want to stop,try but dont cry"असा आशय लिहिण्यात आला होता. तो मेल पाहताच परिस्थितीचे गांभीर्य साळवे साहेबांचे लक्षात आले त्यांनी स्वतः अज्ञाताविरुद्ध तक्रार दाखल केली.

 पुणे शहरात यंत्रणांना अलर्ट करण्यात आले तथापि गुप्तचर यंत्रणेने अशा कोणत्याही प्रकारची  माहिती दिली नव्हती. 
साळवे साहेबांनी प्राथमिक चौकशी करून इंटरनेट सुविधा पुरवणाऱ्या कंपनीकडे व ई-मेल सर्व्हिस देणार्‍या वेबसाइटकडे चौकशीसाठी पत्रव्यवहार केला. इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपनीकडून मेल पाठवण्यासाठी वापरण्यात आलेल्या संगणकाचा आयपी अॅड्रेसची माहिती देण्यात आली. तो धमकीचा मेल पुण्यातील एमजी रोडच्या सिटी नेट कॅफे सायबर कॅफेतून आल्याचे निष्पन्न झाले. सायबर सेलच्या साळवे साहेबांनी सिटी सायबर कॅफेकडे मोर्चा वळवला. प्राथमिक चौकशी करता तो सायबर कॅफे नयनच्या मालकीचा असल्याचे आढळून आले. परंतु नयनकडे चौकशी केली असता सध्या तो कॅफे कृणाल चालवीत असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी कृणालकडे चौकशी केली केली असता तो वादग्रस्त ई-मेल कॅफे मध्ये येणाऱ्या कोणत्यातरी ग्राहकाने पाठवल्याची माहिती सायबर सेल ला कृणाल ने दिली; त्यामुळे सर्वस्तरीय तपासावरून हा धमकीचा ई-मेल केवळ पोलिसांची दिशाभूल करून यंत्रणेला वेठीस धरण्यासाठी कोणत्यातरी टवाळखोर आरोपीने केल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले. त्यापुढे साळवे साहेबांनी सायबर कॅफेमध्ये छननी केली असता तो सायबर कॅफे नोंदणीकृत नव्हता हे त्यांच्या लक्षात आले. तसेच त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रेही नव्हती. सायबर कॅफेमध्ये येणाऱ्या ग्राहकांची माहिती घेण्यासाठी रजिस्टर नव्हते, तसेच ग्राहकांची ओळखपत्रही घेण्यात येत नव्हते. सायबर कॅफे चालवणाऱ्यांनी ई-मेल पाठवणाऱ्या ग्राहकाची काहीच माहिती घेतली नव्हती. त्यामुळे ज्याने तो ई-मेल पाठवला त्या सायबर गुन्हेगारापर्यंत पोहोचण्याची शक्यता अगदीच धुसर झाली होती. साळवे साहेबांनी सायबर कॅफेचा मालक नयन व कॅफे चालवणारा कृणाल यांच्यावर गुन्हा नोंद केला. पुढील तपास सायबर सेलच्या लेडी ऑफिसर रिबेका थाॅमस यांच्याकडे देण्यात आला. त्यांनी आरोपींना अटक करून संबंधित साक्षीदारांचे जबाब घेतले. घटना स्थळावरून कंम्प्यूटर, हार्ड डिस्क जप्त करण्यात आले. त्यावेळी पंचनामा करण्यात आला. ई-मेल आयडीवरून धमकीचा मेल पाठवणा-या मूळ आरोपीचा शोध घेण्यात आला. परंतु, ऑफिसर रिबेका यांना कसलाच ट्रेस लागला नाही. त्यामुळे नयन व कृणाल यांचे विरुद्ध आरोपपत्र कोर्टात दाखल करण्यात आले. आरोपींवर मूळ आरोपीस धमकीचा ई-मेल पाठवण्यासाठी साहाय्य करण्याचा व सायबर कॅफे बाबतचे कायदेशीर मार्गदर्शक नियमांचे उल्लंघन करण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. खटल्याची सुनावणी सुरू झाली. आरोपींनी आरोप अमान्य करून खटला चालवण्याची विनंती केली. या कामी सायबर सेलचे अधिकारी व फिर्यादी साळवे साहेब यांची साक्ष महत्त्वपूर्ण होती. त्यांनी आरोपीच्या नेट कॅफेतुनच ईमेल आल्याचे  पुरावे सादर केले. तसेच ईमेल पाठवणाऱ्या आय. पी. ॲड्रेसचा संगणक आरोपीच्या नेट कॅफेने घेतला होता हे देखील सिद्ध झाले. आरोपीने यावेळी आरोप नाकारीत ई-मेल स्पूफिंग चा म्हणजेच ई-मेल मध्ये मधल्यामध्ये बदल करून पुढे पाठवल्याचे शक्यतेचा बचाव मांडला. परंतु वादग्रस्त ई-मेल बाबत आरोपींनी स्पूफिंग झाल्याचे सिद्ध न केल्याने आरोपींचा बचाव न्यायालयास विश्वासार्हय  वाटला नाही. खटल्याचे अंती मिशन अटॅक  या शीर्षकाखाली धमकी देणारा ई-मेल पाठवणारा अखेर सापडलाच नव्हता. पुराव्यांअंती  नयन व कृणाल यांनी तो वादग्रस्त ईमेल पाठवण्यासाठी सायबर गुन्हेगाराला सहाय्यक केल्याचे पुराव्याने सिद्ध झाले नाही. तथापि सायबर कॅफे चालवताना कायद्याने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन आरोपीने केल्यानेच सायबर गुन्हेगारास अशा प्रकारचा गुन्हा  करता आला असे, मत न्यायाधीशांनी नोंदवत आरोपींनी सायबर कॅफे बाबत मार्गदर्शक कायदेशीर नियमांचा भंग केल्याने त्यांना माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम 67 (क) 2 अन्वये पंधरा दिवसांच्या साध्या कारावासाची व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
 

अन्न -वस्त्र-निवारा सोबतच इंटरनेट ही देखील आता मूलभूत गरज बनली आहे. दैनंदिन  जीवन, कामकाज मनोरंजन,  नातेसंबंध या सर्व गोष्टींवर इंटरनेटच्या वापराचा परिणाम झालेला आहे. इंटरनेटमुळे आपल्या दैनंदिन जीवनात सुलभता प्राप्त झाली आहे. फेसबुक, ट्विटर,इंस्टाग्राम, व्हाट्सअप हे सध्याचे नामांकित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत जे सध्या रोजच वापरले जातात. तथापि इंटरनेटचा बेजबाबदारपणे केलेला वापर म्हणजे समस्यांना निमंत्रण देण्यासारखेच आहे. त्यामुळे मोबाईलच्या स्क्रीन वरती कुठेही क्लिक करण्यापूर्वी दोनदा विचार करून मगच पुढे जाणे योग्य ठरेल. 


अॅड. पृथ्वीराज कदम 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com