नेर्ले (कोल्हापूर) : भावा भावात वाद आणि एकमेकांना जीवे मारण्यापर्यंत च्या घटना समाजात पाहायला मिळतात. पण धाकट्या भावाच्या मृत्यूच्या धसक्याने थोरल्या भावाने प्राण सोडल्याची हृदय हेलावणारी घटना घडली आहे. एकाच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे समस्त माणिकवाडी गावावर शोककळा पसरली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे ग्रामस्थांनाही शोकभावना अनावर झाल्या.
वाळवा तालुक्यातील महामार्गाच्या पश्चिमेला पेठ गावच्या कुशीत माणिकवाडी गाव आहे. गावातील रामचंद्र दादू गडाळे (वय ९८) आणि महादेव दादू गडाळे (वय ९०) या जीवापाड प्रेम करणाऱ्या भावा भावांनी आपले प्राण एकाच दिवशी सोडले. धाकट्या भावाच्या धसक्याने थोरल्या भावाने आपला अखेरचा श्वास रडत रडत आणि भावाच्या मृत्यूचं दुःख सांडत सोडला.
संबंधित घटना अशी, चार दिवसापूर्वी रामचंद्र आणि महादेव हे दोघेही काही दिवसांच्या अंतराने बाथरूममध्ये पाय घसरून पडले होते. दोघेही घरीच अंथरुणावर पडून होते. थोरल्या भावाला झालेली दुखापत व वेदना महादेव यांना सहन झाल्या नाहीत. महादेव यांनी सकाळी अकराच्या सुमारास प्राण सोडले. तर धाकटा भाऊ गेल्याच्या दुःखात अश्रू सांडत रामचंद्र यांनी देखील सायंकाळी मरणाला जवळ केले. जीवनप्रवासात राम लक्ष्मणासारखे राहणाऱ्या जोडीने अनंताच्या प्रवासालाही एकत्र सुरुवात केली. दोन्ही भावांनी गरिबी जवळून अनुभवली होती. हलाखीच्या परिस्थितीत परंपरागत मेंढपाळचा व्यवसाय केला. या चार भावांच गावात बंधुप्रेम नावाजण्या सारखं होत. भावंडांनी मोठ्या धीराने मेंढपाळ व्यवसाय सांभाळत पाठच्या दोन्ही भावंडांना व मुलांना उच्च शिक्षण दिले.
पाठच्या दोन भावांची मुले आज पोलिस दलात आणि नौदलात कार्यरत आहेत. मोठं आणि एकंदरीत कुटुंबात राहणाऱ्या, एकाच विचाराने काम करणाऱ्या, गावात सगळ्यांबरोबर जिव्हाळ्याचे संबंध असणाऱ्या आणि मरणही एकत्र कवटाळणाऱ्या दोन भावांच्या तब्बल ९० वर्षांचा दीर्घ प्रवासाचा खेळ एकत्रितच संपल्याने गावकरी हळहळत आहेत.
संपादन - स्नेहल कदम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.