मोठी ब्रेकिंग ! 50 लाख शेतकऱ्यांना मिळाला नाही सन्मान निधी 

_1555767974.jpg
_1555767974.jpg

सोलापूर : देशातील दोन हेक्‍टरपर्यंत क्षेत्र असलेल्या बळीराजाला दरवर्षी तीन हप्त्यात सहा हजार रुपये देण्याचा निर्णय मोदी सरकारने 1 डिसेंबर 2018 मध्ये घेतला. त्यानुसार महाराष्ट्रातील 84 लाख शेतकरी पात्र ठरले. लॉकडाउन काळात बळीराजाला मदत म्हणून सरकारने एप्रिल ते जूनदरम्यान दिला जाणारा दोन हजारांचा हप्ता वितरीत करण्याचे जाहीर केले. मात्र, अद्याप 50 लाख शेतकऱ्यांची माहितीच अपलोड झाली नसून उर्वरित 34 लाख शेतकऱ्यांपैकी अनेकांना पैसेच मिळालेले नाहीत, अशी माहिती कृषी विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. 

जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला हमीभाव मिळाला नाही, मात्र सन्मान निधीच्या माध्यमातून त्यांना मोदी सरकारने दिलासा दिला. महाराष्ट्रातील 88 लाख 67 हजार शेतकऱ्यांची (दोन हेक्‍टरपर्यंत क्षेत्र) माहिती केंद्राला कळविली. मात्र, त्यापैकी 84 लाख शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा पहिला मिळाला. तर दुसरा हप्ता 68 लाख शेतकऱ्यांना आणि 60 लाख शेतकऱ्यांना तिसरा हप्ता मिळाला. योजना सुरु झाल्यापासून राज्यातील 28 लाख शेतकऱ्यांचा सन्मान झालेलाच नाही. 2019-20 मध्ये एकूण 84 लाख शेतकऱ्यांपैकी 60 लाख शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळाला. तर लॉकडाउन काळात सर्वच शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता द्यावा, असे केंद्र सरकारने जाहीर करुनही केवळ 34 लाख शेतकऱ्यांचीच माहिती अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी बहूतांश शेतकऱ्यांना पैसे मिळाले नसून उर्वरित 50 लाख शेतकऱ्यांची माहिती अद्यापही अपलोड झालेली नाही. त्यामुळे लॉकडाउन काळात अडचणीत सापडलेल्या बळीराजाला सन्मान निधीची आणखी काही दिवस प्रतीक्षाच करावी लागेल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

50 लाख शेतकऱ्यांची माहिती अपलोडींग सुरु 
एप्रिल ते जून या तीन महिन्यांत दिला जाणारा सन्मान निधीचा पहिला हप्ता लॉकडाउनमुळे एप्रिलमध्येच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जात आहे. 34 लाख शेतकऱ्यांची माहिती अपलोड केली असून त्यापैकी बहूतांश शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत. उर्वरित 50 लाख शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्याचे काम सुरु आहे. 
- जयंत टेकाळे, उपायुक्‍त, कृषी 

ठळक मुद्दे... 

  • राज्यातील 84 लाख शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी मिळाले सन्मान निधीचे प्रत्येकी दोन हजार रुपये 
  • एकूण 84 लाख शेतकऱ्यांपैकी 68 लाख शेतकऱ्यांना मिळाला दोन हजारांचा दुसरा हप्ता 
  • 72 लाख शेतकऱ्यांना मिळाला अंतिम हप्ता : पहिल्या वर्षात 28 लाख शेतकऱ्यांना दुसरा अन्‌ तिसरा हप्ताच नाही 
  • लॉकडाउन झाल्यानंतर एप्रिल ते जूनदरम्यान मिळणारा सन्मान निधीचा हप्ता वितरीत करण्याचे केंद्राचे आश्‍वासन 
  • राज्यातील एकूण 84 लाख शेतकऱ्यांपैकी 34 लाख शेतकऱ्यांचीच माहिती अपलोड : तब्बल 50 लाख शेतकऱ्यांना निधीची प्रतीक्षाच 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com