ती योग्य व्यक्ती कोण? "या' 23 ग्रामपंचायतींवर येणार प्रशासक ! काय आहेत शासनाचे नवीन निकष? ते वाचा 

panchayat.
panchayat.

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍यातील जवळपास 23 ग्रामपंचायतींची मुदत लवकरच संपणार आहे. त्यामुळे मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या संदर्भात निर्णय नुकताच झाला असला तरी या प्रक्रियेमध्ये प्रशासकाचे निकष शासनाने काढले असून, त्या निकषांमध्ये विद्यमान सरपंच, उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य यांना प्रशासक होता येणार नाही. तसेच प्रशासक पद कोणत्याही जातीसाठी किंवा प्रवर्गासाठी राखीव ठेवता येणार नाही, असेही निर्देश शासनाने दिले आहेत. गावच्या मतदार यादीतील योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती करा, असा शासन निर्णय ग्रामविकास विभागाने 14 जुलै रोजी दिला आहे. त्यामुळे गावागावात चर्चेला उधाण आले असून "ती योग्य व्यक्ती कोण?' व त्या योग्य व्यक्तीचा शोध कोणत्या निकषावर घ्यायचा? याबाबत सविस्तर मार्गदर्शन शासनाने दिले नसल्यामुळे प्रशासक होण्याच्या शर्यतीत असलेले "आपली नियुक्ती कशी होणार' या विचाराने सध्यातरी बुचकळ्यात पडले आहेत. 

राज्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने प्रशासकाची नियुक्ती करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आला. त्यामुळे प्रशासक म्हणून विराजमान होणाऱ्या व्यक्तीची निवड करण्याबाबत प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण होणार आहे. यामध्ये काही ठिकाणी राजकीय सौदेबाजी होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

तालुक्‍यामधील 23 ग्रामपंचायतींच्या मुदती ऑगस्ट व नोव्हेंबर 2020 अखेरीस संपत असून, ऑगस्टला मुदत संपणाऱ्या 15 ग्रामपंचायती आहेत. नोव्हेंबरला मुदत संपणाऱ्या आठ ग्रामपंचायती आहेत. राज्यात कोरोनाचा वाढता आलेख पाहता या ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यामुळे मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती होणार आहे. या अगोदर प्रशासक म्हणून मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर पंचायत समितीमधील सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती होत होती. मात्र नुकताच शासनाने निर्णय घेत त्याच गावातील रहिवासी असलेल्या व मतदानाचा अधिकार असलेल्या "योग्य व्यक्ती'ची प्रशासक म्हणून नियुक्ती करा, असे आदेश काढल्याने अनेकांनी या शर्यतीत उतरण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या तालुक्‍यामध्ये विद्यमान आमदार भारत भालके, आमदार प्रशांत परिचारक व दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांचे गट प्रवाह असल्यामुळे या तिन्ही गटांशी संबंधित नसलेली व्यक्ती प्रशासकपदी विराजमान होणार का? याचीही उत्सुकता लागून राहिली आहे. 

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती 

  • ऑगस्ट 2020 : लमाण तांडा, कात्राळ-कर्जाळ, बोराळे, अरळी, तांडोर, सलगर (बु), लवंगी, डोणज, कचरेवाडी, मुंढवी, महमदाबाद (शे), घरनिकी, मल्लेवाडी, भोसे, लेंडवेचिंचाळे. 
  • नोव्हेंबर 2020 : मरवडे, सिद्धापूर, हुलजंती, आसबेवाडी, माचणूर, तामदर्डी, गणेशवाडी, नंदेश्वर. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com