अक्कलकोटमध्ये जनता कर्फ्यूचा निर्णय, मात्र "या' महासंघाचा विरोध

Corona
Corona

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोटमध्ये सुरू असलेला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करणे व एकमेकांच्या संपर्कातून निर्माण होणारी या विषाणूची साखळी तोडण्यासाठी अक्कलकोट शहरात सोमवार 6 ते सोमवार 13 जुलैपर्यंत आठ दिवस जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात आले आहे. शहराच्या हिताच्या दृष्टिकोनातून सर्व जनतेने व व्यापारी वर्गाने याचे पालन करावे, असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. मात्र, अक्‍कलकोट व्यापारी महासंघाने या कर्फ्यूला विरोध दर्शविला आहे. 

खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, नगराध्यक्षा शोभा खेडगी, सर्वपक्षीय नेते यांनीही जनता कर्फ्यूस पाठिंबा दर्शविला आहे. अक्कलकोट नगरपरिषद कार्यालयात गुरुवारी आयोजित सर्वपक्षीय बैठकीस खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, नगराध्यक्षा शोभा खेडगी, मुख्याधिकारी आशा राऊत, संजय देशमुख, अविनाश मडिखांबे, अशपाक बळोरगी, दिलीप सिद्धे, उत्तम गायकवाड, बंटी राठोड, सुनील बंडगर, सद्दाम शेरीकर, कांतू धानशेट्टी, चंदन आडवितोटे, मोतिराम राठोड, बसलिंगप्पा खेडगी, धानप्पा कामाठी, योगेश पवार, राहुल रुही, वसंत देडे, मलिक बागवान आदींसह नगरसेवक, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. 

या वेळी शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, कोविड केअर सेंटर व क्वारंटाइन लोकांच्या समस्या, स्वच्छता आदीबाबत चर्चा झाली व सर्वानुमते कोरोनाची साखळी तोडण्यासाठी फक्त मेडिकल व सकाळी 11 वाजेपर्यंत दुधाचा पुरवठा वगळता सर्व दुकाने शंभर टक्के बंद करून आठ दिवस कडक जनता कर्फ्यू पाळण्याबाबत निर्णय घेण्यात आला. पुढे बोलताना आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, जनता कर्फ्यूमुळे लोकांची गैरसोय होणार आहे. पण शहराच्या हितासाठी कठोर निर्णय घेणे आवश्‍यक आहे. लाकडाउन जाहीर झाल्यानंतर शंभर टक्के सर्व्हे करून प्रशासनाकडून थर्मल स्कॅनिंग करण्यात येईल. कोरोनाचा प्रादुर्भाव अजून नियंत्रणाच्या बाहेर गेलेला नाही. आताच साखळी तोडता येते. कोरोना नियंत्रणासाठी चर्चा करून निर्णय घेण्यात आले. सर्वपक्षीय बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला. महेश हिंडोळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या वेळी दिलीप सिद्धे, संजय देशमुख, अविनाश मडिखांबे, अश्‍पाक बळोरगी, सुनील बंडगर, उत्तम गायकवाड, वसंत देडे, अमर देडे, नगराध्यक्षा शोभा खेडगी यांनी मनोगते व्यक्त केली. 

कोण काय म्हणाले? 
सोलापूर ते अक्कलकोट रस्ता कायमचे बंद करा, अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय नाही. कोविड सेंटरमध्ये सोईसुविधा नाहीत. काळजी घेतली जात नाही, असे मत अविनाश मडिखांबे यांनी मांडले. 
अशपाक बळोरगी यांनी, प्रशासनात सुसूत्रता आणावी, असे सांगून अँटिजेन टेस्ट किट उपलब्ध करून चाचणी करण्यासाठी खासदार यांनी लक्ष घालावे व जास्तीत जास्त किट मिळवावेत, असे सांगितले. 
सुनील बंडगर यांनी, क्वारंटाइनमध्ये सेवासुविधा नाहीत, तिथे कोणीच बघायला नाही. त्यामुळे रुग्ण भीतीने मरायला नकोत. बससेवा बंद करा, असे आवाहन केले. 
उत्तम गायकवाड यांनी आधी कामगार, कष्टकरी यांच्या पोटापाण्याची सोय करा. जनता कर्फ्यू हा काही उपाय नाही, असे सांगून कठोर उपाययोजना करा, असे आवाहन केले. 

हा काही पर्याय नाही 
अक्कलकोट व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मल्लिनाथ साखरे यांनी निर्णयाला विरोध दर्शवून म्हणाले, जनता कर्फ्यूबाबत मोबाईलवरून माहिती मिळाली आहे. हा काही पर्याय नाही. आम्ही व्यापारी वर्ग काळजी घेऊ. या जनता कर्फ्यूला आमचा विरोध आहे. आम्हाला विश्वासात घेण्यात आले नाही. 

उपाध्यक्ष प्रसन्न हत्ते म्हणाले, जनता कर्फ्यूस व्यापारी महासंघाचा विरोध आहे. जनता कर्फ्युमुळे काही केल्या साखळी तुटत नाही. व्यापारी वर्ग कोरोना महामारीने अडचणीत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com