अकलूज (सोलापूर) : लग्न सोहळ्यास गर्दी जमवून नियमांचे उल्लंघन केले, धोकादायक परिस्थिती निर्माण केल्याच्या कारणावरून यशवंतनगर येथील आठ जणांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तलाठ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकलूज पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा : जूनमध्ये पावसाने केली सरासरी पूर्ण
याबाबत अकलूज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, सोलापूर यांनी आपत्ती व्यवस्थापन व भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम कायदा लागू केला आहे. असे असताना यशवंतनगर येथे रविवारी (ता. 12) लग्न सोहळ्यात सुमारे 100 ते 150 लोकांची गर्दी जमवण्यात आली होती. गर्दी जमवण्यास मनाई आदेश असतानाही, गर्दी जमवून मानवी जीवितास धोकादायक असलेला संसर्ग पसरवण्यासारखे हयगयीचे कृत्य केलेख, म्हणून तलाठी यांनी अकलूज पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून नववधू-वर, लग्न लावणारे भटजी, फोटोग्राफर, मंडप डेकोरेशनचे मालक आदींसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाला गर्दी जमवल्याच्या कारणावरून माळशिरस तालुक्यात पहिलाच गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
अकलूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवानराव निंबाळकर म्हणाले, लग्न कार्यास शासन नियमाप्रमाणे फक्त 50 लोक, तसेच उपस्थितांनी सामाजिक अंतर, तोंडाला मास्क, परिसर सॅनिटाईझ आदी नियमांचे पालन करावे; अन्यथा कारवाई होईल. तसेच जागरूक नागरिकांनी दक्ष राहून कोणत्याही कारणास्तव गर्दी जमत असल्यास तत्काळ अकलूज पोलिस स्टेशनला 02182222100 या क्रमांकावर कळवावे. माहिती देणाराचे नाव गुप्त ठेवून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.