"टीईटी'तील चुकांच्या शोधासाठी समिती 

"टीईटी'तील चुकांच्या शोधासाठी समिती 

सोलापूर ः राज्यात 19 जानेवारीला झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) पेपरमध्ये मोठ्या प्रमाणात चुका झाल्या आहेत. एवढ्या चुका कशा झाल्या याची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात येणार आहे. ती समिती जो निर्णय देईल, त्याची अंमलबजावणी केली जाईल. चुकलेल्या प्रश्‍नांना गुण देण्याचा निर्णय समितीने घेतला तर त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी "सकाळ'ला दिली. 

राज्यात 19 जानेवारीला महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्यावतीने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात आली. या परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी बसले होते. पण, परीक्षा परिषदेने या परीक्षेसाठी काढलेल्या पेपरमध्ये व्याकरणाच्या चुकांनी शंभरी पार केल्याचे दिसून आले. त्याचा नाहक त्रास परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागला. 
डीएड, बीएड अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना गुरुजी होण्यासाठी "टीईटी' परीक्षा उत्तीर्ण असणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे राज्यात मागील तीन-चार वर्षापासून ही परीक्षा घेतली जाते. अनेक गुणवंत विद्यार्थी असूनही ही परीक्षा द्यावी लागत आहे. याशिवाय जे शिक्षक म्हणून सेवेत आहेत, त्यांनाही ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्‍यक आहे. त्यामुळे या सगळ्या शिक्षकांसाठी नुकतीच ही परीक्षा घेण्यात आली. यापूर्वी झालेल्या परीक्षेच्या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा केल्या गेल्या. परीक्षेतील प्रश्‍नांची काठिण्य पातळी खूपच किचकट असल्याच्या चर्चा करण्यात आल्या. चांगल्या गुरुजींची निवड होण्यासाठी तशा काठिण्य पातळीचा उपयोग प्रश्‍नपत्रिका तयार करण्यासाठी केला जातो. हे एकवेळ आपण समजून घेऊ शकतो. मात्र, या परीक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या प्रश्‍नपत्रिकांमध्ये 100 पेक्षा जास्त चुका करणे परीक्षा परिषदेला शोभणारे नक्कीच नाही. 

"टीईटी' परीक्षेसाठी दोन पेपर होते. या दोन्ही पेपरमध्ये व्याकरणाच्या चुका झाल्या आहेत. एका पेपरमधील 76 व्या प्रश्‍नात तब्बल चार चुका आहेत. हा प्रश्‍न पुढीलप्रमाणे ः "शिक्षकाळडे असलिले ज्ञान विद्यार्थ्यामध्ये संक्रमित होत असताना जर समान्यीकरण व तर्कानुमान या मानसिक प्रक्रियांचा अवलंब होत असेल तर अध्यापनाच्या या प्रकाराला...असे म्हणतात.' हा प्रश्‍न आहे. या प्रश्‍नामध्ये "शिक्षकाळडे', "असलिले', "विद्यार्थ्यामध्ये', समान्यीकरण असे जवळपास चार शब्दामध्ये व्याकरणाच्या चुका आहेत. याशिवाय तिच्यातील या शब्दाऐवजी निच्यातील, वाढते या शब्दाऐवजी वाठते, विश्‍वासार्हता या शब्दाऐवजी विश्‍वासर्हता या चुकीच्या शब्दांचा वापर या प्रश्‍नपत्रिकेमध्ये केला आहे. त्यामुळे टीईटी परीक्षेच्या पेपरमध्ये परीक्षा परिषदेने केलेल्या चुका या अक्षम्य असल्याचे मत अनेक शिक्षणतज्ञांनी व्यक्त केले आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com