विमा पोर्टल जाम ! बॅंकांचे असहकार्य, सीएससी सेंटरसमोर रांगा; प्रस्ताव सादर करण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस त्यामुळे शेतकऱ्यांची उडाली तारांबळ 

Farmer
Farmer

मंगळवेढा (सोलापूर) : पंतप्रधान फसल बिमा योजनेत यंदाच्या हंगामात विमा पोर्टल जाम राहिल्यामुळे तालुक्‍यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना विमा प्रस्ताव दाखल करण्यासाठी दिवसभर ताटकळत थांबावे लागले. दरम्यान, मुदतवाढ न मिळाल्याच्या परिपत्रकामुळे व उद्या (शुक्रवारी) प्रस्ताव दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने शेतकऱ्यांची मात्र तारांबळ उडाली आहे. 

तालुक्‍यात शेतकऱ्यांना विम्याचा मोठा आधार मिळाला. दरवर्षी पीक जळून नुकसान होत होते. यंदा पाणी लागून नुकसान होण्याची परिस्थिती आहे. यंदाच्या खरीप हंगामात पीक विम्याचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी आपले प्रस्ताव सीएससी सेंटर किंवा बॅंकांमध्ये दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तालुक्‍यामध्ये बहुसंख्य बॅंकांनी शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव दाखल करून घेण्याचे टाळल्यामुळे शेतकऱ्यांना सीएससी सेंटरचा रस्ता दाखवण्यात आला. तालुक्‍यात यंदा सूर्यफुलाचे पीक वाढले असताना त्याचा समावेश न करता, न घेत असलेल्या कापसाचा समावेश करण्यात आला आहे. प्रस्तावात गैरप्रकार टाळावा म्हणून यंदा शासनाने विमा कंपनीच्या पोर्टलला शासनाच्या महा भूमीलेख पोर्टल जोडण्यात आले. त्यामुळे सातबारावरील क्रमांक, गट क्रमांक व आठ वरील खाते क्रमांक हे दोन क्रमांक टाकल्यावर शेतकऱ्याचे नाव व जमिनीच्या क्षेत्रामध्ये होणारा गैरप्रकार टळला. परंतु हा सातबाराच ओपन होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसभर ताटकळत बसावे लागले आहे. 

तालुक्‍यामध्ये ग्रामपंचायतीकडे असलेल्या सेंटर चालकांना दुसरे काम लावल्याने त्यात पुन्हा विम्यासाठी गर्दी होत असल्यामुळे हे दोन्ही काम करताना त्यांना नाकीनऊ येत आहे. विमा प्रस्ताव दाखल करण्याची उद्या (शुक्रवारी) अंतिम मुदत आहे. त्यामुळे यामध्ये बहुसंख्य शेतकरी वंचित राहण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. कोरोनाच्या संकटामध्ये शेतकऱ्यांना शेतीतील कामे सोडून विमा प्रस्ताव दाखल करताना मात्र थांबावे लागत आहे. सातबारा उताऱ्यातील त्रुटींसाठी तलाठ्याकडे सातबारा पाठविण्यात आले. परंतु तालुक्‍यात तलाठ्याचे पद रिक्त असल्यामुळे शेतकऱ्यांना मंगळवेढ्यात जावे लागले. यात शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. त्यामुळे एक तर विमा प्रस्ताव दाखल करण्याची वेळ वाढवावी नाहीतर बॅंकांत ऑफलाइन प्रस्ताव घेऊन शेतकऱ्यांची गैरसोय टाळावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 

जालिहाळचे सीएससी सेंटर चालक अक्षय शेंबडे म्हणाले, आज दिवसभर सर्व्हर डाऊन असल्यामुळे सेंटरसमोर शेतकऱ्यांची रांग होती. परंतु फक्त तीनच प्रस्ताव दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाला व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. 

आमदार भारत भालके म्हणाले, विमा पोर्टल जाम व बॅंकांच्या निष्काळजीमुळे शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल कृषिमंत्री यांच्या कानावर हा प्रकार घालणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com