बोलघेवड्या सरकारविरोधात शिक्षक, शेतकरी व पदवीधरांचा निवडणुकीत दिसेल असंतोष 

fadanvis.jpg
fadanvis.jpg

सोलापूर ः सध्याचे महाविकास आघाडीचे सरकार बोलघेवडे असून राज्यातील शिक्षक, पदवीधर आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात निर्माण झालेला असंतोष या निवडणुकीमध्ये दिसून येणार अशी टिका माजी मुख्यमंत्री तथा विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली. 

येथील हेरिटेज लॉन सभागृहात भाजपाचे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संग्राम देशमुख आणि शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. 

श्री. फडणवीस म्हणाले की, या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारची कार्यक्षमता नाही. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी सरकारने काम केले नाही. या सरकारने केवळ प्रत्येक आदेशाला स्थगिती देण्याचे काम केले. सरकारला कोणती कामगिरी करता आली नाही याचा असंतोष लोकांमध्ये आहे. आता बिहारमधील निवडणुका व त्यानंतर देशाच्या चारही झालेल्या निवडणुकांमध्ये लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेऊन भाजपला मते दिली आहेत. बिहारमध्ये भाजपाने चौथ्यांदा निवडणूक कोरोना, महापूर व स्थलांतरीत मजुरांचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामाच्या आधारे जिंकली. लोकांना पंतप्रधान मोदी सरकार कर्मयोगी नेता हवा आहे मात्र आपले राज्य सरकार हे केवळ बोलघेवडे आहे. 
वीज बिलाच्या संदर्भात ऊर्जामंत्र्यांनी घेतलेली उलट-सुलट भूमिका पाहता हा असंतोष वाढला आहे. काही दिवसापूर्वी ऊर्जामंत्र्यांनी वाढविलेल्या बिलाबाबत भूमिका घेऊ असे सांगितले. नंतर त्यांनी माझा अभ्यास झाला नव्हता असे सांगून लोकांनी बिले भरावीत असे सांगितले. मात्र लोक न वापरलेल्या विजेची बिले भरणारच नाहीत. न वापरलेल्या विजेची बिले देणे मुळातच चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. 
राज्य सरकारने कोणतीही समाधानकारक कामगिरी केली नाही. शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रति हेक्‍टरी मदत देऊ असे आश्वासन सरकारच्या प्रमुख पुढाऱ्यांनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात तेवढी मदत दिलेली नाही. अनेकांपर्यंत मदत पोहोचली देखील नाही. शिक्षकांच्या वेतन अनुदान अनुदानाबाबत घेतलेली निर्णय सरकारने स्थगित केले. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष आहे. पदवीधरांचे बाबतीतही हीच परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. 
संग्राम देशमुखांसारखा तरुण तडफदार उमेदवार भाजपने दिला आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी केलेली कामगिरी राष्ट्रीय पातळीवर गाजलेली आहे. त्यांचा जनसंपर्क व विविध क्षेत्रातील कामगिरी लक्षणीय आहे. शिक्षक मतदारसंघातील उमेदवार जितेंद्र पवार हे उमेदवार देखील सोलापूरचे असल्याचे सांगून दोघांना निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर महापौर श्रीकांचना यन्नम, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर स्वामी, खासदार रणजीतसिंह निंबाळकर, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, गोपीचंद पडळकर, विजय देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, उपमहापौर राजेश काळे आदी उपस्थित होते. 
भाजपचे सरचिटणीस रुद्रेश बोरामणी यांनी आभार मानले तर बिज्जू प्रधाने यांनी सूत्रसंचालन केले.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com