बियाणांच्या घोळानंतरही पावसाने साथ दिली पण खतांच्या तुटवड्याने शेतकऱ्यांचे पुन्हा हाल !

khate.jpg
khate.jpg

सोलापूरः सोलापूर परिसरात खरिप हंगामासाठी झालेल्या उपयुक्त पावसाने खरिपाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले. आधी बियाणांचा उगवणीचा फटका बसल्यानंतर सावरलेले शेतकरी खताची मागणी करीत आहेत. मात्र कंपन्याकडून खतेच मिळत नसल्याने युरिया, डीएपी अशा खतांच्या तुटवड्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

चांगल्या पावसाने पिकांची वाढ होत असताना खते आवश्‍यक असल्याने शेतकरी परिसरातील बाजारपेठामध्ये खताचा शोध घेत फिरत आहेत. त्यात काही कंपन्यांनी खतासोबत लिंकेजची अट टाकल्याने जास्तीचा भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. 

या वर्षी अगदी जून महिन्यापासूनच पावसाने सुरूवात केली. खरिप हंगामाच्या सुरवातीला चांगला पाऊस झाल्याने या स्थितीचा लाभ उठवण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. दरवर्षी खरिपाचे क्षेत्र पावसाच्या कमी प्रमाणामुळे क्षेत्र कमी असते. या वर्षी जोरदार पावसाने खरिपाचे क्षेत्र अचानक वाढले. खताच्या बाजारपेठेला या बदलाचा अंदाज आला नाही. मात्र खत कंपन्याकडे केलेल्या वार्षिक मागणी चा आकडा मागील वर्षीप्रमाणे कमी राहिला. कंपन्याकडून देखील राज्यातील इतर भागात ज्या ठिकाणी खरिप हंगाम नियमित असतो तिकडे जादा पुरवठा असे धोरण असते. 


सोलापुरच्या अचानक वाढलेल्या खरिप क्षेत्रासाठी लागणारी खते अगदीच कमी प्रमाणात पुरवली गेली. परिणामी शहराच्या बाजारात कोणतीच खते पुरेशी नव्हती. मागील महिनाभरापासून युरिया, डिएपी व इतर खतांची मागणी मोठ्या प्रमाणात शेतकरी करीत आहेत. काही कंपन्यांनी या खताला लिंकेजची अट टाकली आहे. त्याच कंपनीची किडनाशक किंवा इतर वस्तुची खरेदीची सक्ती केली जात आहे. त्यामुळे व्यापारी देखील त्रासून गेले आहेत. शेतकऱ्यांना मागील भाजीपाला हंगाम अयशस्वी झाला व दुधाचे जोडधंदे दुधाचे भाव नसल्याने कमी झाल्याने आर्थिक अडचणीत आले आहेत. तसेच बियाणे न उगवल्याचा देखील फटका बसला आहे. त्यामुळे त्रस्त झालेला शेतकरी लिंकेजसाठी जास्त खर्च करण्यास तयार नाही. 
मागील दहा दिवसाच्या लॉकडाउनमध्ये पंढरपूरला खताचा रॅक लागला होता. मात्र लॉकडाउनमुळे सोलापूरात खत पोहोचलेच नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांची अडचण झाली. 
आता मुग व उडदाचे पीक काही दिवसात हाताशी येण्यात आले. त्यासाठी युरिया खताची मागणी शेतकरी करीत आहे. पण बाजारात लिंकेजच्या शिवाय खते मिळत नाहीत. शासकीय अंगीकृत खत कंपन्याचा अपुरा पुरवठा तर खासगी खत कंपन्याची लिंकेजची सक्ती या कात्रीत खताची बाजारपेठ सापडली आहे. 

बाहेरगावी खताचा शोध 
काही दिवसापासून आम्हाला खते मिळत नाही. गावात देखील खत मिळाले नाही म्हणून बाहेरगावी जाऊन खताचा शोध घेतला. काही दुकानदाराशी बोलून खताची मागणी केली आहे. पीके चांगली असल्याने खताची मोठी गरज आहे. 
- नागनाथ चराटे, डोणगाव 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com