"या' तालुक्‍यातील तीन मंडलामधील "इतक्‍या' शेतकऱ्यांची अवस्था ना घर का ना घाट का ! कारण काय? वाचा 

Farmer Cartoon
Farmer Cartoon

मंगळवेढा (सोलापूर) : दुष्काळ, अवकाळी पाऊस व रोगराईमुळे तालुक्‍यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. तालुक्‍यात दुष्काळ व अवकाळी नुकसानीची नोंद कृषी व महसूलकडे असताना विमा कंपनीने भरपाईतून तीन मंडले वगळली तर अवकाळीच्या भरपाईतून विमा भरलेले शेतकरी वगळल्याने मंगळवेढा, मरवडे व भोसे मंडलातील तीन हजार 57 शेतकऱ्यांची अवस्था "घर का ना घाट का' अशी झाली आहे. 

गतवर्षी तालुक्‍यातील मरवडे, बोराळे, आंधळगाव, भोसे, मारापूर, हुलजंती, मंगळवेढा या सात महसुलांतील जवळपास आठ हजार शेतकऱ्यांनी डाळिंब पिकाचा विमा भरला. जूनपासून ऑक्‍टोबर अखेरपर्यंत फळपिकांना दुष्काळाने घेरले. हातातोंडाशी आलेल्या फळबागा ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या अवकाळी पावसाने झोडपून काढल्या. त्यामुळे शेतकरी पुरता अडचणीत आला. दरम्यान, महसूल व कृषी खात्याने नुकसानीचे जे पंचनामे केले त्यामध्ये मात्र विमाधारक शेतकऱ्यांना फळपिकाची दर हेक्‍टरी 18 हजार रुपयांची भरपाई दिली नाही. शासन व विमा कंपनीकडूनही नुकसान भरपाई नाही, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. तर बजाज विमा कंपनीने भरपाई मंजूर करताना हुलजंती व मारापूर मंडलाला हेक्‍टरी 27 हजार तर बोराळे व आंधळगाव मंडलाला 11 हजार रुपयांची भरपाई दिली. त्यामधूनही 670 शेतकऱ्यांना वगळले. त्यासाठी "सकाळ'ने आवाज उठवल्यानंतर नुकतीच काही शेतकऱ्यांना रक्कम अदा करण्यात आली. अजूनही काही प्रतीक्षेत आहेत. तर भोसे 1355, मरवडे 1132, मंगळवेढा 570 अशा तीन हजार 57 शेतकऱ्यांना भरपाईपासून वगळण्यात आले. दुष्काळ आणि अवकाळी पावसाचा फटका संपूर्ण तालुक्‍याला बसला. अशा स्वरूपातील नोंदी व पंचनामे कृषी आणि महसूल खात्याकडे उपलब्ध असताना देखील विमा कंपनीने कोणता निकष लावून अन्याय केला, हे कोडे मात्र अनुत्तरित आहे. तालुक्‍याला दोन लोकप्रतिनिधींचा आधार मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या; परंतु अद्यापही हे शेतकरी विम्यापासून वंचित आहेत. 

चिक्कलगीचे शेतकरी ईश्‍वर निकम म्हणाले, बोराळे व आंधळगाव मंडलमध्ये हेक्‍टरी भरपाई 11 हजार दिली पण त्यासाठी हप्ता मात्र सहा हजारांचा होता. बागेसाठी औषध खर्च आणि मेहनतीचा विचार केला तर विमा नेमका कुणासाठी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. गतवर्षी हेक्‍टरी 55 हजार भरपाई दिलेल्या मंगळवेढा, भोसे, मरवडे मंडलला वगळून विमा कंपनीने सवतीची भूमिका घेतली आहे तर शासनाने नियम दाखवल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार म्हणाले, अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे करताना कृषी व महसूल खात्याबरोबर विमा कंपनीचा प्रतिनिधी पाठवणे आवश्‍यक होते. पावसाच्या नोंदीत तफावत दाखवून तीन मंडलांना वगळून दिलेली भरपाई तोकडी असून, कंपनीने शेतकऱ्याला फसवण्याचे उद्योग चालू केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com