सोलापूर : केंद्राच्या गरीब कल्याण पॅकेजमधून महाराष्ट्रातील एकाही कामगारांना अद्याप दमडाही मिळाला नाही. मात्र, लॉकडाउन काळातील कामगारांच्या अडचणी जाणून आता राज्य सरकार राज्यातील 12 लाख 38 हजार नोंदणीकृत कामगारांनाच दोन टप्प्यात पाच हजार रुपये देणार आहे. हातावरील पोट असलेले राज्यात तब्बल तीन कोटी 65 लाख असंघटित कामगार असून लॉकडाउनमुळे त्यांच्या हातातील काम गेल्याने त्यांना आता पोटाचा प्रश्न सतावू लागला आहे.
हेही नक्की वाचा : केंद्राला हवे लॉकडाउन ! 15 दिवसांची मुदतवाढ शक्य
राज्यात उद्योग क्षेत्रात 28 लाख, आयटी इंडस्ट्रीज व कमर्शियल क्षेत्रात 55 लाख, संघटित कामगारांची संख्या 80 लाख आहे. मात्र, 22 मार्चपासून राज्यातील सर्वच उद्योग बंद असल्याने कामगार घरी परतले आहेत. या कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्यावे असे निर्देश सरकारने दिले आहेत. मात्र, बहूतांश कामगारांना वेतन मिळालेले नसून काही कामगारांना ते मिळणार नसल्याचे उद्योगांनी स्पष्ट केल्याची चर्चा आहे. दरम्यान, राज्यातील कामगारांचे प्रश्न सोडवून त्यांना अपेक्षित लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारने सुकाणू समिती स्थापन केली आहे. मात्र, या समितीचा अद्याप अभ्यास पूर्ण झाला नसल्याने समितीचा अहवाल सरकारकडे गेलेला नाही. दरम्यान, हातातील काम गेल्याने जगावे की मरावे असा प्रश्न पडलेल्या कामगारांनी हाताला काम द्यावे अथवा सरकारने मदत तरी करावी, अशी मागणी केली आहे.
दोन टप्प्यात मिळेल अडीच हजाराचे अनुदान
राज्यातील नोंदणीकृत कामगारांना दोन टप्प्यात पाच हजारांचे अनुदान देण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला असून मजुंरीनंतर अडीच हजारांचा पहिला टप्पा लगेच कामगारांच्या खात्यात वर्ग केला जाईल. राज्यात सुमारे 12 लाख नोंदणीकृत कामगार असून त्यांना दोन टप्प्यात अनुदान दिले जाणार आहे. उद्योग, आयटी व कर्मिशियल, संघटित कामगारांना संबंधित उद्योजकांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन द्यावेच लागेल.
- दिलीप वळसे-पाटील, कामगार मंत्री
हेही नक्की वाचा : अबब ! सोलापुरात 14 हजारांहून अधिक व्यक्तींविरुध्द गुन्हे
महामंडळाकडे 31 हजार कोटी
केंद्र सरकारने एक लाख 70 हजार कोटींचे गरीब कल्याण पॅकेज जाहीर केले, मात्र त्यातून दमडाही कामगारांसाठी महाराष्ट्र सरकारला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे राज्याच्या कामगार कल्याण महामंडळाकडे विविध उपकराच्या माध्यमातून जमा झालेले 31 हजार कोटी रुपये आहेत. त्यातून राज्यातील नोंदणीकृत 12 लाख कामगारांना दोन टप्प्यात पाच हजार रुपये दिले जाणार आहेत. मात्र, राज्यात संघटित कामगारांची संख्या 80 लाख तर असंघटित कामगारांची संख्या तीन कोटी 65 लाखांपर्यंत आहे. तरीही यांच्या बाबतीत काहीच निर्णय झालेला नाही.
राज्यातील कामगारांची सद्यस्थिती
उद्योग क्षेत्रातील कामगार
28 लाख
आयटी, कमर्शियल कामगार
55 लाख
संघटित कामगार
80 लाख
असंघटित कामगार
3.65 कोटी
कामगार मंडळाकडील नोंदणीकृत कामगार
12.38 लाख
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.