स्वत:चे शिक्षण सोडून बहिणीला शिकवले, पण शहीद सैनिकाचे अधुरेच राहिले स्वप्न

Nagappa and Shridevi
Nagappa and Shridevi

सोलापूर : मंगळवेढ्यासारखा दुष्काळी भाग... हुलजंती येथील पाच एकर शेतजमीन पाण्याअभावी कोरडवाहू... अशा परिस्थितीत कुटुंबातील दोन भाऊ (धर्मण्णा, म्हाळप्पा) आणि तीन बहिणींचा मोठा पसारा सांभाळण्याच्या हेतूने भाऊ नागप्पा याने बारावीनंतर शिक्षण सोडून कुटुंबाचा गाडा स्वत:च्या खांद्यावर घेतला. बहिणी (यल्लव्वा, पार्वती, श्रीदेवी) शिकून मोठ्या झाल्या तर त्यांना चांगले सासर मिळेल म्हणून हमालीला सुरवात केली. 

भावाची मेहनत अन्‌ त्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने बहिणी शिक्षण घेत होत्या. त्याचवेळी दोघींचा विवाह झाला, मात्र दुसऱ्या क्रमांकावरील बहिणीने (श्रीदेवी) भावाचे स्वप्न पूर्ण करण्याची खूणगाठ मनाशी बांधली होती. भावाच्या मेहनतीला अखेर 2013 मध्ये फळ मिळाले आणि श्रीदेवी पोलिसात भरती झाली. दरम्यान, नागप्पाही (2011) सैन्य दलात भरती झाले. 

नोकरी लागल्यानंतर दोघांच्या मेहनतीतून शेती सुधारली. कुटुंबाची परिस्थितीही हळूहळू सुधारू लागली. तेवढ्यात भावाचा विवाह झाला आणि त्याला वैष्णवी (सहा वर्षे) आणि माही (पाच महिने) ही दोन चिमुकली झाली. सर्व काही ठीक होते. कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. परंतु, श्रीदेवी 2015 मध्ये पोलिस भरतीचे प्रशिक्षण पूर्ण करून घरी आल्यानंतर काही दिवसांतच वडिलांचा (सोमण्णा) मृत्यू झाला. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. तरीही श्रीदेवी त्यातून सावरली आणि भावाचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने तिने पाऊल टाकले. 2016 ते 2018 या तीन वर्षांत श्रीदेवीने राष्ट्रीय स्तरावर आठशे ते पंधराशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत सलग तीनवेळा कांस्यपदक पटकावले. श्रीदेवीने ही कामगिरी करून पोलिस दलाची मान राष्ट्रीय स्तरावर उंचावली. राष्ट्रीय स्तरावर मान उंचावणाऱ्या श्रीदेवीला शासनाच्या निकषानुसार सहायक पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती मिळणार आहे. मात्र, आता हे स्वप्न पाहण्यासाठी तिचा भाऊ नागप्पा हयात नसल्याचे दु:ख आहे. 

लाल फितीतील प्रमोशन भावाच्या हयातीत मिळालेच नाही 
राष्ट्रीय स्तरावर नाव उंचावणाऱ्या खेळाडूंना पोलिस दलात पदोन्नती दिली जाते. हुलजंती (ता. मंगळवेढा) येथील श्रीदेवी म्हेत्रे यांनी धावण्याच्या स्पर्धेत सलग तीन (2016 ते 2018) वर्षे कांस्यपदकाला गवसणी घातली. सैन्य दलात कार्यरत असलेल्या भावाला बहीण अधिकारी झालेले पहायचे होते. मात्र, लाल फितीत अडकलेले प्रमोशन तीन-चार वर्षांपासून मिळालेच नाही. दरम्यान, सैन्य दलातील भावाला बहिणीने हालहवाला विचारण्यासाठी कॉल केला. मात्र, तो शेवटचा कॉल ठरेल याची थोडीशीही कल्पना श्रीदेवीला व नागप्पाला नव्हती. चार दिवसांनंतर (कारगिल विजयी दिवस) भाऊ नागप्पा शहीद झाल्याची बातमी पहाटे दीड वाजता कानावर पडली. सर्व काही ठीक आहे म्हणणारा नागप्पा आपल्याला सोडून गेल्याने कुटुंबावर पुन्हा दु:खाचा डोंगर कोसळला. नागप्पाची मुले लहान असून ज्याच्यामुळे मला सरकारी नोकरी मिळाली, त्याच्या मुलांसाठी काहीतरी करायचे, या हेतूने श्रीदेवी यांनी अजूनही विवाह केलेला नाही. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com