सोलापूरः नुकतीच पावसाला सुरुवात झाली आणि सर्व बाग प्रेमी कामाला लागले. नर्सरी मधून विविध प्रकारची रोपे आणण्यापासून ते कुंडी व इतर साहित्य आणण्यास सुरुवात झाली आहे.
परसबागेतील झाडांना नेमकी खते कोणती द्यायची असा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा घरच्या बागेला अगदी घरातील वाया जाणाऱ्या गोष्टीमधून उत्तम खते तयार करता येतात.
हेही वाचाः कृषी संजीवनी सप्ताहाचा शुभारंभ
कांद्याचे पाणी ः कांद्यामध्ये अनेक पोषक घटक आहेत जसे मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक, फॉस्फरस, मॅग्नीज, आयन, कॅल्शियम हे पोषक घटक झाडांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. कांद्याच्या साली किंवा खराब झालेला कांदा कापून तो हवाबंद डब्यात पाणी घालून तीन दिवस ठेवावा. त्यामुळे कांद्याच्या सालीतील पोषक घटक त्या पाण्यात जातील. नंतर हे पाणी गाळून घेऊन त्यात पाणी टाकावे आणि हे पाणी झाडांच्या मुळाशी द्यावे. चांगले कांदे कापून त्याचे बारीक तुकडे करून घ्यावे किंवा हे तुकडे मिक्सरमध्ये घालून पेस्ट तयार करावी. त्यानंतर हे कांद्याचे बारीक तुकडे किवा पेस्ट प्लास्टिकच्या किंवा स्टीलच्या हवाबंद डब्यात पाणी टाकून तीन दिवस ठेवावे. तीन दिवसानंतर हे मिश्रण गाळून घ्यावे व त्यात काही लिटर पाणी टाकून झाडांना मुळाशी द्यावे. या पद्धतीमध्ये कांद्याचा अर्क त्या पाण्यात चांगला उतरतो आणि लवकर परिणाम दिसतात.
हेही वाचाः पंढरपूरमध्ये आणखी तिघाजणांना झाला कोरोना
केळीचे पाणीः केळी मध्ये व केळीच्या साली मध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम फॉस्फरस, कॅल्शियम, मॅंगॅनीज, लोह, झिंक खूप जास्त प्रमाणात असतात. केळी व केळीच्या साली बारीक कापून किंवा मिक्सर मधून काढून त्याची पेस्ट करावी व ही पेस्ट तीन दिवस हवाबंद डब्यात ठेवावी. तीन दिवसानंतर हे मिश्रण चाळणीने गाळून घेऊन त्या मध्ये साधे पाणी घालून झाडांना मुळाशी द्यावे.
तांदळाचे पाणी ः वरण भात करताना धुतलेल्या तांदळाचे पाणी झाडांसाठी खूप पोषक असते हे पाणी आपल्याला लगेच झाडांना देता येते.
शेणाचे पाणी ः शेण घेऊन त्यात पाणी मिसळून ते पाणी तीन दिवस झाकून ठेवावे तीन दिवसानंतर झाडांच्या मुळाशी द्यावे.
वरील सर्व घटक पदार्थ हे आपण तीन दिवस पाण्यामध्ये प्रक्रिया करून नंतर ती वापरतात. त्यातील पोषक द्रव्य पाण्यात मिसळून झाडांची मुळे ती लवकर शोषून घेतात.
गुळाचे पाणीः लहान चमचे गूळ घेऊन एक लिटर पाण्यामध्ये मिक्स करावे व ते पाणी झाडावर फवारणी पण करता येईल किंवा झाडाच्या मुळाशी पण टाकता येईल यातील पोषक द्रव्यांमुळे पण झाडाला बहर येतो व झाडाची वाढ होते.
मधाचे पाणी ः मधामध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे झाडाला विशेषतः लिंबूच्या झाडाला बहर चांगला येतो. तीन ते चार चमचे मध एक लिटर पाण्यात मिसळून त्याची झाडावर फवारणी करावी. वरील प्रमाण झाडाच्या आकारानुसार हवे तसे कमी जास्त करता येईल.
ताकाचे पाणीः जुने उरलेले ताक सुद्धा झाडांना मुळाशी देता येईल. जेवढे ताक असेल तेवढेच पाणी मिसळून झाडाच्या मुळाशी खुरपणी करून द्यावे.
हळदीचे पाणीः हळदीचे पाणी झाडांवर लागलेली कीड किंवा लहान कीटक यापासून त्यांचे संरक्षण करते.- लहान चमचे हळद एक लिटर पाण्यात टाकावी त्याची फवारणी संपूर्ण झाडावर करावी जमिनीत टाकू नये, झाडावर पांढरा मावा असेल तर लहान चमचे डिटर्जंट पावडर लिटर पाण्यात घेऊन ते फवारावे. असे - दिवसांनी करावे.
कंपोस्ट खतः आपल्या घरी रोज किचन वेस्ट तयार होत असते. कांद्याच्या व केळीचा तयार झालेल्या चौथा तसेच भाज्यांच्या सालीं. देठ,मुळे खराब झालेल्या पालेभाज्या कैची ने कापुन घेऊन नेहमी एखाद्या बादली मध्ये कींवा जुन्या एखाद्या माठामध्ये जमा करावी. त्या बादलीला किंवा जुन्या माठाला लहान छिद्रे करावीत. रोजचे किचन वेस्ट त्यात जमा करावे व नियमित त्यावर मातीचे थर टाकावे. अधूनमधून त्यात ताकाचे चे पाणी टाकत जावे. महिन्यात उत्तम प्रतीचे कंपोस्ट खत तयार होते. हे कंपोस्ट खत चाळणीने गाळून झाडांना द्यावे. वरील सर्व उपाय घरगुती असुन याला खूप कमी खर्च येतो तसेच किचन मधील कचरा वापरला जातो.
कांदा व केळीच्या पाण्याचे फायदे
कांदा व केळीच्या पाण्यामध्ये प्रचंड प्रमाणात पोषक घटक असल्याने झाडांची संपूर्ण वाढ होते,झाडांना खूप फुले येतात, नवीन पालवी येते, तसेच मुळांची वाढ होते आणि झाड बहरून येते. या पोषक पाण्यामुळे गुलाब, जास्वंद, मोगरा, जाई, जुई, सदाफुली ही फुलझाडे व फळझाडांमध्ये निंबु, टमाटे,वांगे, कारले, डाळिंब,पेरू त्यांना खूप फुले येऊन भरपूर प्रमाणात फळे येतात.
काळजी कोणती घ्यावी
कांदा किंवा केळीची पाणी नेहमी प्लास्टिक किंवा स्टीलच्या हवाबंद डब्यात करावे. तांबा, पितळ किंवा ऍल्युमिनियमचे भांडे वापरू नये. ही भांडी वापरली तर खत उपयुक्त ठरणार नाही. डब्याचे झाकण पक्के बंद असावे. बाहेरील हवा त्या मिश्रणाला लागू देऊ नये मिश्रण गाळून लगेच साधे पाणी टाकून झाडांच्या मुळाशी खुरपणी करून द्यावे. कांदा व केळीचे पाण्याचे परिणाम लगेच दिसतात. सुरुवातीला दर दिवसांनी थोडे थोडे पाणी द्यावे व परिणाम बघून या पोषक पाण्याचे प्रमाण ठरवावे. जमिनीचा पोत, वातावरण, झाडाचा प्रकार, झाडाची प्रजाती याचा फरक पडतो.
घरगुती खतामुळे बाग बहरली
माझी भाजीपाला व फुलांची बाग आहे. कांदा पाणी व इतर खते घरीच तयार करतो. फळांच्या साली देखील मीक्सरमधून काढून किंवा तशाच भिजवत ठेवून नंतर त्याचेही पाणी खत म्हणून वापरले आहे. त्याचा झाडांच्या वाढीसाठी चांगला उपयोग होतो आहे.
- सुचेता मिलींद थोबडे, सावरकर नगर सोलापूर.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.