विठुरायाच्या मूर्तींवर मंगळवारी, बुधवारी होणार चौथ्यांदा वज्रलेप 

The idol of vitthal will be chemical coating for the fourth time on Tuesday and Wednesday
The idol of vitthal will be chemical coating for the fourth time on Tuesday and Wednesday

पंढरपूर (जि. सोलापूर) : श्री विठ्ठल-रुक्‍मिणीच्या मूर्तींची झीज झाल्यामुळे दोन्ही मूर्तींवर वज्रलेप करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. मंगळवारी (ता. 23) आणि बुधवारी (ता. 24) औरंगाबाद येथील भारतीय पुरातत्त्व विभागाचे उपअधीक्षक श्रीकांत मिश्रा व मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सर्व सदस्य तसेच सल्लागार परिषदेचे सर्व सदस्य यांच्या समक्ष रासायनिक लेपन (वज्रलेप) प्रक्रिया केली जाणार आहे, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी दिली. 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 17 मार्चपासून श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर भाविकांसाठी बंद आहे. ही वज्रलेप प्रक्रिया आषाढी एकादशीपूर्वी व्हावी यासाठी मंदिर समिती प्रयत्नशील होती. या प्रक्रियेसाठी आवश्‍यक मंजुरी मिळावी यासाठी मंदिर समितीने शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. मंदिर समितीच्या प्रस्तावाला 4 जून रोजी शासनाने मंजुरी दिली होती. त्यानंतर मंदिर समितीने या संदर्भातील आवश्‍यक पाठपुरावा सुरू केला होता. आता दोन दिवसांत पुरातत्त्व विभागाचे अधिकारी वज्रलेप प्रक्रिया करणार आहेत. 
सध्याची श्री विठ्ठल मूर्ती 12व्या शतकापूर्वीची आहे असे मानले जाते. वालुकाश्‍म प्रकारच्या पाषाणातील ही मूर्ती आहे. श्री रुक्‍मिणीमातेची मूर्ती नेपाळमधील गंडकी नदीत सापडणाऱ्या गुळगुळीत पाषाणापासून बनवण्यात आलेली असल्याचे सांगितले जाते. श्री विठ्ठलाची मूर्ती काहीशी खडबडीत तर श्री रुक्‍मिणी मातेची मूर्ती अतिशय रेखीव अशी आहे. 
श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने या संदर्भातील ठराव करून औरंगाबाद येथील पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना पंढरपूरला बोलवून त्यांच्याकडून श्री विठ्ठल-रुक्‍मिणीच्या मूर्तीची तसेच संपूर्ण मंदिराची पाहणी करून घेतली होती. पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी वज्रलेप प्रक्रिया करण्याविषयी अहवाल दिल्यानंतर श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने मार्च 2020 मध्ये विधी व न्याय विभागाकडे रासायनिक लेपन प्रक्रिया करून घेण्याविषयी परवानगी मागितली होती. यापूर्वी औरंगाबाद येथील पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन ते चार दिवसांत अतिशय चांगल्या पद्धतीने वज्रलेप प्रक्रिया पूर्ण केली होती. सध्या मंदिर भाविकांसाठी बंद असल्यामुळे प्रक्रिया करण्यास कोणतीही अडचण नसल्याने काम वेगाने पूर्ण होणार आहे. 
या संदर्भात श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांना विचारले असता "सकाळ'शी बोलताना ते म्हणाले, आषाढी एकादशी 1 जुलै रोजी आहे. वज्रलेप प्रक्रिया आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेच्या आधी पूर्ण करण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न सुरू होता. आता अवघ्या दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com