
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाने प्रवासी वाहतूक करणारी चारचाकी वाहने (एम) आणि मालवाहतूक करणारी चारचाकी वाहने (एन) या संवर्गाच्या वाहनांसाठी फास्ट टॅग अनिवार्य केले आहे. टोल नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागू नयेत, टोल वसुलीची प्रक्रिया सुरळित होण्यासाठी फास्ट टॅग महत्त्वाचे आहे. संबंधित विक्रेते, वाहतूकदार आणि टॅक्सी युनियन यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.
सोलापूर : राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर 1 जानेवारी 2021 पासून टोल वसुलीची प्रक्रिया फास्ट टॅगद्वारे सुरू झाली आहे. चारचाकी वाहनधारकांनी तत्काळ फास्ट टॅग बसवून घ्यावे, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी दिला आहे.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाने प्रवासी वाहतूक करणारी चारचाकी वाहने (एम) आणि मालवाहतूक करणारी चारचाकी वाहने (एन) या संवर्गाच्या वाहनांसाठी फास्ट टॅग अनिवार्य केले आहे. टोल नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागू नयेत, टोल वसुलीची प्रक्रिया सुरळित होण्यासाठी फास्ट टॅग महत्त्वाचे आहे. संबंधित विक्रेते, वाहतूकदार आणि टॅक्सी युनियन यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.
अशी आहे दंडात्मक कारवाई
वाहन फास्ट टॅगशिवाय रस्त्यावर आढळून आल्यास मोटार वाहन कायदा 1988 मधील कलम 177 नुसार 200 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. डोळे यांनी सांगितले.
टोल नाक्यांवर आहेत तांत्रिक अडचणी
फास्ट टॅग असलेल्या वाहनांसाठी टोलनाक्यावर स्वतंत्र लेनची सुविधा करण्यात आली आहे. मात्र फास्ट टॅग वाहनांची संख्या वाढूनही लेन मर्यादितच आहेत. तर दुसरीकडे, फास्ट टॅग रीड होताना नेटवर्कचा तांत्रिक अडथळेही निर्माण होत आहेत. त्यामुळे वाहनांना त्या ठिकाणी थांबून पुढे जावे लागत आहे. टोल नाक्यावर न थांबता वाहने थेट जावीत म्हणून फास्ट टॅगची सक्ती केली जात आहे; मात्र या तांत्रिक अडचणीमुळे तो हेतू साध्य होताना दिसत नाही.
संपादन : श्रीनिवास दुध्याल