A kidnapped youth from Dadpur has been killed
A kidnapped youth from Dadpur has been killed

दादपूर येथील अपहरण झालेल्या युवकाचा खून; आरोपींना सात दिवस पोलिस कस्टडी

बेगमपूर (सोलापूर) : दादपूर (ता. मोहोळ) येथील दीड महिन्यापूर्वी अपहरण केलेल्या वीस वर्षीय युवकाचा गावातीलच दोघा युवकांनी पैशासाठी निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि.30) दादपूर शिवारात उघडकीस आली. या प्रकरणी कामती पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांना सात दिवसाची पोलिस कस्टडी देण्यात आली आहे. आरोपींनी अपहरण केलेल्या रात्रीच युवकाचा खून करून तब्बल बावीस दिवसांनी मोबाईलवर पैसे मागणीचा मेसेज पाठविला होता.

राजवैभव रघुनाथ कांबळे (रा. दादपूर ता. मोहोळ वय 20 वर्ष ) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून विशाल दत्तात्रय कांबळे (वय23) आणि विकी दत्तात्रय कांबळे (वय19) (रा. दोघेही दादपूर, ता. मोहोळ) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत कामती पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, राजवैभव कांबळे हा वीस वर्षीय तरुण 18 फेब्रुवारीला सायंकाळी आईला बाहेर जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडला. त्याला डोळ्याला स्पष्ट दिसत नसल्याने व रात्री उशिरापर्यंत तो घरी न आल्याने त्याच्या कुटूंबियांनी सर्वत्र शोध घेतला. परंतु त्याचा कोठेच ठावठिकाणा लागत नाही. अखेर त्याच्या वडीलांनी कामती पोलिस ठाण्यांमध्ये 19 फेब्रुवारी रोजी आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.

दरम्यान 1 मार्च रोजी आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिस तपास करण्यात आला. परंतु सदर संशयितविरुद्ध पोलिसांना कोणताही सबळ पुरावा हाती लागला नाही. दरम्यान गावातीलच विशाल दत्तात्रय कांबळे (रा.दादपूर ता.मोहोळ) व विकी दत्तात्रय कांबळे (रा.दादपूर ता.मोहोळ ) या दोघा भावावर संशय असल्याचे मयत तरुणाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले होते. दरम्यान या दोघा संशयित आरोपीना चौकशीसाठी बोलविण्याअगोदरच ते आपल्या कुटूंबासह पळून गेले होते. यामुळे या प्रकरणातील गुढ अधिक वाढले होते.

दरम्यान पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे यांनी कामती ठाण्याला भेट दिली व या तपास कामी ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यानुसार ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी कामती पोलिसांचे दोन व स्थानिक गुन्हा शाखेची दोन अशी चार पथके सोलापूर व पुणे जिल्ह्यात कार्यान्वित केली होती. दरम्यान 11 मार्च रोजी अपहरण झालेल्या राजवैभव कांबळे याच्या घरातील मोबाईलवर पैशाची मागणी करणारा मेसेज आला.

पोलिसांनी तात्काळ सदर मेसेज आलेल्या मोबाईल नंबरच्या दिशेने शोध मोहीम राबविली परंतु आरोपींनी सदरचा मोबाईलच बंद ठेवला. यामुळे तपास कामात पोलिसांची मोठी अडचण निर्माण झाली होती. अखेर कामती पोलिसांनी विशाल कांबळे व विकी कांबळे या दोघांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपींना पोलिस खाक्या दाखविताच गुन्हा केल्याची कबुली दिली. 18 फेब्रुवारीच्या रात्रीच राजवैभव कांबळे याला अज्ञातस्थळी नेऊन त्याचे हात व पाय बांधून दोरीच्या साह्याने गळा आवळून खून केल्याचे व सदरचे प्रेत त्यांनी अज्ञात स्थळी पुरल्याचे सांगितले.

मृतदेह पुरल्याची जागा ही त्यांनी दाखवली. पोलिसांनी सदर घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी सदरचा मृतदेह तेथे आढळून आला. कामती पोलिसांनी योग्य दिशेने केलेल्या तपासामुळे अपहरण व खून केलेल्या आरोपींचा शोध लागला. सदर घटनेची पोलिसांत नोंद झाली असून सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सचिन खटके करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com