प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांवरही 1 एप्रिलपासून लसीकरण ! मेपासून सर्वांनाच टोचली जाणार लस

2vaccination_20.jpg
2vaccination_20.jpg

सोलापूर : कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीकरणाचा तिसरा टप्पा आता सुरु झाला आहे. 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांनाच लस दिली जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर 50 आरोग्य उपकेंद्रांवरही लस टोचली जाणार आहे. त्यासाठी 319 समुदाय आरोग्याधिकाऱ्यांची नियुक्‍ती केली जाणार आहे. तर मेपासून 18 ते 20 वर्षांवरील सर्वांनाच लस टोचली जाईल, अशी शक्‍यता वरिष्ठ सूत्रांनी वर्तविली असून केंद्र सरकारकडून त्यासंदर्भात लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचेही सांगण्यात आले.

प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर सुरू होईल लसीकरण 
सोलापूर शहर-जिल्ह्यासाठी दोन लाख डोसची मागणी केली आहे. 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांनाच लस टोचली जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील 50 प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांवरही लसीकरण सुरु केले जाणार आहे. 
- डॉ. अनिरुध्द पिंपळे, जिल्हा समन्वयक, लसीकरण 

सोलापूर शहर-जिल्ह्यासाठी आतापर्यंत एक लाख 93 हजार डोस उपलब्ध झाले आहेत. आता आठ हजारांपर्यंत डोस शिल्लक आहेत. सध्या जिल्ह्यातील 126 केंद्रांवरून दररोज साडेसात हजार लोक लस टोचून घेत आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यासाठी दोन लाख डोस उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी नोंदविण्यात आली. अजून तेवढी लस मिळालेली नाही. लसीकरणाच्या तिन्ही टप्प्यात जिल्ह्यातील सुमारे साडेचार लाख लोकांना लस टोचणे अपेक्षित आहे. परंतु, आतापर्यंत एक लाख 32 हजार लोकांना पहिला डोस तर 33 हजारांहून अधिक लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. पहिला डोस घेतलेल्यांना दुसऱ्या डोससाठी तर अनेकांना पहिला डोस घेण्यासाठी लस द्यावी, असेही त्या पत्रात नमूद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सोलापूर शहर-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तत्काळ लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नोंदविण्यात आली आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर मोहोळ, बार्शी, माळशिरस, सांगोला, पंढरपूर, करमाळा या तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांवर लसीकरण सुरु केले जाणार आहे. 

पुण्याला गेले सोलापूरचे 20 हजार डोस 
सोलापूर शहर-जिल्ह्यातून लस टोचून घेण्यासाठी लोकांचा प्रतिसाद वाढत आहे. 45 ते 60 वर्षांपर्यंतचे को-मॉर्बिड रुग्णांसह 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा त्यात समावेश आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापूर जिल्ह्याला 50 हजार डोस उपलब्ध करून देण्यात आले. कोरोना वाढत असल्याचेही कारण त्यामागे होते. मात्र, पुण्यात कोरोना वाढत असून लस कमी पडेल म्हणून त्याठिकाणच्या प्रशासनाच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यासाठी आलेल्या लसीतून 20 हजार डोस परत पाठविण्यात आली आहे. आता 31 मार्चपर्यंतच पुरेल इतकी लस शिल्लक असल्याने पुन्हा लस कधीपर्यंत मिळणार याबाबत कोणीही स्पष्टपणे सांगू शकत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com