लॉकडाउनचा परिणाम : केळी टाकली जात आहे जनावरांना

लॉकडाउनचा परिणाम : केळी टाकली जात आहे जनावरांना
लॉकडाउनचा परिणाम : केळी टाकली जात आहे जनावरांना

करमाळा (सोलापूर ): केळीचे कोठार म्हणून सोलापूरची ओळख निर्माण होत आहे. त्यातही करमाळा तालुक्‍यात केळीचे प्रमाण वाढले आहे. असे असताना कोरोनाच्या सावटामुळे विक्री करण्याच्या वेळी केळी जनावरांना टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील केळी परदेशात मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. मात्र, सध्या लॉकडाउनमुळे केळी बाहेर जात नाही. याचा फटका केळी उत्पादकांना बसला आहे. केळी काढण्याची वेळ आलेली आहे, मात्र केळी घेऊन जाण्यासाठी साधन उपलब्ध नसल्याने ती जनावरांना टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 
करमाळा तालुक्‍यातील कंदर येथे एक शेतकरी केळीत ट्रॅक्‍टर फिरवण्याच्या तयारीत असून अनेकांवर केळी जनावरांना घालण्याची वेळ आली आहे. शेलगाव-भाळवणी परिसरात परराज्यातील दूध व्यवसाय करणारे सध्या वांगी, कंदर, चिखलठाण, कविटगाव भागातून शेतकऱ्यांकडून फुकट केळी आणून जनावरांना खाऊ घालत आहेत. 
एकेकाळी ऊस साखर कारखान्याला घालवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत होती. उसाला पर्याय म्हणून शेतकरी केळीकडे वळाले. गेल्या सहा-सात वर्षांत केळीचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणावर वाढत गेले. या भागातील केळीची गुणवत्ता चांगली असल्याने परदेशातही मागणी वाढू लागली. त्यातच काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून शासनाने काही योजना सुरू केल्या आहेत. त्यातूनच 
करमाळा तालुक्‍यातील शेटफळ येथे कोल्ड स्टोअरेजचे बांधकाम सुरू झाले, त्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. मात्र, कोरोनामुळे केळी उत्पादक अडचणीत आला आहे. 
 
कवडीमोल दराने केळीची मागणी 
व्यापारी मातीमोल दराने केळीची मागणी करत आहेत. एक ते दोन रुपये दराने व्यापारी केळी घेऊ लागले आहेत. महिन्यापूर्वी 14 ते 15 रुपये किलो दराने विकली जाणारी केळी आज कवडीमोल झाली आहे. लॉकडाउनमुळे देशांतर्गत बाजारपेठेत मागणी कमी झाली आहे. याचाही काही प्रमाणात परिणाम दरावर झाला आहे. 

शेतकऱ्यांसमोरील अडचणी 
निर्यातीसाठी शेतमाल वाहतूक सुरू झाली असली तरी यासाठी लागणारे बॉक्‍स व पॅकिंग साहित्य याचे उत्पादन व वाहतूक बंद आहे. हे साहित्य उपलब्ध होत नाही. केळी काढणीसाठीचे प्रशिक्षित लेबर हे मोठ्या प्रमाणावर उत्तर प्रदेश, बिहार राज्यातील आहेत. संचारबंदी, जमावबंदीमुळे त्याची एकत्रित वाहतूक करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीत त्यांच्या राहण्याची सोय करण्यासाठी स्थानिक लोक अडचणी आणत आहेत. कृषी विभागाच्या वतीने या केळीच्या विक्रीची व्यवस्था होणे गरजेचे आहे. 

व्यापाऱ्यांकडून परिस्थितीचा फायदा 
केळी हे नाशवंत पीक असल्याने त्याची काढणी वेळेत होणे गरजेचे आहे. ती न झाल्यास शेतातच केळीचे घड खाली पडून खराब होऊन माल सडतो. कोरोनाच्या संकटामुळे केळी वाहतूक व विक्रीसाठी अडचणी येत असल्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांच्या सध्या काढणीसाठी आलेल्या केळीला अतिशय कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. याचा फायदा काही व्यापारी उठवत असून अतिशय कमी दराने माल मागितला जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

लोकविकास शेतकरी उत्पादक कंपनीने कोल्ड स्टोअरेज उभारणी सुरू

नुकसान कमी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे त्याच्या मालकीची साठवणूक व्यवस्था असणे गरजेचे आहे. शासनाने मोठ्या प्रमाणावर कोल्ड स्टोअरेज उभी केली पाहिजेत. जे शेतकरी स्वतः उभारण्यास तयार असतील त्यांना अर्थिक व तांत्रिक मदत केली पाहिजे. आमच्या लोकविकास शेतकरी उत्पादक कंपनीने कोल्ड स्टोअरेज उभारणी सुरू केली असून त्याचे काम पूर्ण नसल्याने सध्याच्या काळात तर फारच गरज असल्याचे जाणवले. प्रत्येक गावात अशी स्टोअरेज निर्माण केली पाहिजेत. 
- वैभव पोळ, केळी उत्पादक शेतकरी व संचालक,

लोकविकास शेतकरी उत्पादक कंपनी, शेटफळ  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com