...वाट बघतोय रिक्षावाला! 

Riksha Stand
Riksha Stand

सोलापूर : लॉकडाउनमुळे 22 मार्चपासून बंद असलेल्या रिक्षा सोमवार (ता. 8) पासून रस्यावरून धावायला सुरवात झाली आहे. मात्र प्रवाशांअभावी म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने नेहमीपेक्षा रिक्षांची रस्त्यावरील संख्या तशी रोडावल्याचे दिसून आले. चौका-चौकात रिक्षाचालक रिक्षा लावून प्रवाशांची वाट पाहताना दिसून आले. 

लॉकडाउन शिथिलीकरणामुळे शहरातील सर्व व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. उद्योग-व्यवसाय सुरू झाल्याने बाजारपेठेत सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत रहदारी दिसून येत आहे. मात्र विडी उद्योग बंद असल्याने पूर्वभागातील रिक्षाचालकांना पहिल्या दिवशी तरी प्रवासी मिळवण्यासाठी नुसतेच फिरावे लागले. प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आदेश देऊन एका रिक्षात फक्त दोनच प्रवासी वाहतुकीला परवानगी दिल्यानेही रिक्षा व्यवसायावर परिणाम झाला आहे. शेअर रिक्षाचालकांनी प्रति प्रवासी पाच रुपये वाढ केल्याने प्रवासीही रिक्षा प्रवास टाळत आहेत. लॉकडाउनमुळे आता कोणाच्याच हातात पैसा नसल्याने वाढीव प्रवासी दर मिळेल का, यामुळे व्यवसाय कसा होणार, अशी चिंता आता रिक्षाचालकांमधून व्यक्त होत आहे. 

कंटेन्मेंट झोनमुळे रिक्षा वाहतुकीवर परिणाम 
सोमवारी रिक्षा वाहतूक सुरू झाली मात्र प्रवासी मिळत नव्हते. त्यातच शहरातील वाढलेल्या कंटेन्मेंट झोन परिसरातून रिक्षा वाहतुकीला बंदी आहे. मोठ्या संख्येने प्रवासी मिळणाऱ्या गोदूताई परुळेकर विडी घरकुल परिसरातही रिक्षा वाहतुकीला बंदी आहे. एसटी बस बंद आहेत, रेल्वे बंद आहेत. यामुळे पूर्व भागातील अनेक शेअर रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचे दिसून आले. 

व्यवसाय सुरू झाला हे महत्त्वाचे 
अडीच महिन्यानंतर आता रिक्षा रस्त्यावर उतरल्या याचे समाधान आहे. आज पहिल्या दिवशी प्रवासी मिळाले नाहीत. नागरिक बाहेर पडायला घाबरत आहेत. अनेकांकडे पैसा नाही, त्यात एका रिक्षात दोनच प्रवासी घेण्यामुळे दरवाढ करावी लागली. त्यामुळेही रिक्षाचा वापर सहसा कमी होणार आहे. मात्र आमचा व्यवसाय पुन्हा सुरू झाला, हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. 
- अंबादास साळुंके, रिक्षाचालक 

हवा प्रवाशांचा प्रतिसाद 
कंटन्मेंट झोन वगळून रिक्षा चालवाव्या लागत आहेत. त्यातही एका रिक्षात दोन प्रवासी घेतल्याने नुकसान होत आहे. दरवाढ केली तर प्रवासी रिक्षात बसत नाहीत. त्यातच रेल्वे व एसटी बस बंद असल्याने तसेच कोरोनाच्या भीतीमुळे प्रवासी घराबाहेर पडत नसल्याने रिक्षा व्यवसाय पहिल्या दिवशी तरी मंद होता. प्रवाशांचा प्रतिसाद मिळायला हवा. 
- सलीम मुल्ला, सहसचिव, सीटू महाराष्ट्र राज्य 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com