लाल माती ते राजकीय आखाड्यात भारतनानांनी केले भल्या-भल्यांना चारीमुंड्या चित ! 

Bharat_Bhalke
Bharat_Bhalke

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भारत तुकाराम भालके (वय 60) यांचे शुक्रवारी पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान रात्री उशिरा निधन झाले. त्यापूर्वी सायंकाळी देशाचे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी रुबी हॉस्पिटलमध्ये जाऊन तेथील डॉक्‍टरांकडे आमदार भारत भालके यांच्या प्रकृतीविषयी चौकशी केली होती. दरम्यान, भालकेंची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली.

त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, विठ्ठल कारखान्याचे संचालक भगिरथ भालके, तीन विवाहित मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे. 

30 ऑक्‍टोबर रोजी आमदार भारत भालकेंना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. यशस्वी उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मात देखील केली होती. मात्र त्यांना आठ दिवसांपूर्वी पुन्हा त्रास जाणवू लागला होता. उपचारासाठी रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. गुरुवारी (ता. 26) त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास वाढल्याने शुक्रवारी दिवसभर त्यांची प्रकृती चिंताजनक होती. दरम्यान, रात्री उशिरा त्यांचे निधन झाले. आमदार भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर तालुक्‍यावर शोककळा पसरली आहे. 

आमदार भारत भालके यांची राजकीय पार्श्वभूमी 
2004 साली पहिल्यांदा भारत भालके यांनी शिवसेनेत प्रवेश करून विधानसभेची निवडणूक लढवली. माजी आमदार सुधाकर परिचारक आणि (कै.) राजूबापू पाटील यांच्या विरोधात त्यांनी लढत देत तब्बल 40 हजारांहून अधिक मते घेतली होती. तिरंगी लढतीत परिचारक यांनी बाजी मारली होती. 

2009 साली भालके यांनी "रिडालोस'कडून निवडणूक लढवली होती. त्या वेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा पराभव करत "जायंट किलर' म्हणून पहिल्यांदाच राज्याला ते परिचित झाले. 

2014 साली त्यांनी कॉंग्रेसकडून निवडणूक लढवली होती. भाजप आमदार प्रशांत परिचारक आणि राष्ट्रवादीचे उमेदवार चंद्रकांत बागल यांचा त्यांनी पराभव केला होता. 

2019 मध्ये राज्यात भाजप - शिवसेनेची लाट असतानाही त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली. या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार सुधाकर परिचारक यांचे तगडे आव्हान समोर असताना देखील भालके यांनी सर्वसामान्य जनतेच्या बळावर (कै.) परिचारकांचा सुमारे 14 हजारांहून अधिक मताधिक्‍याने पराभव करत विजयाची हॅट्ट्रिक केली. 

काम करण्याची तडफ आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जाण्याची त्यांची पद्धत यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांची क्रेझ होती. 

1992 पासून तालुक्‍याच्या राजकारणात सक्रिय 
पैलवान असलेले आमदार भारत भालके हे थेट 1992 साली विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळामध्ये आले. संचालकाच्या रूपाने त्यांनी थेट तालुक्‍याच्या राजकारणामध्ये प्रवेश केला. अवघ्या काही दिवसांतच त्यांनी औदुंबरअण्णा पाटील यांचा विश्वास संपादन केला. त्याच विश्वासावर त्यांना कारखान्याचे उपाध्यक्षपदही मिळाले. 
दरम्यानच्या काळात वसंतराव काळे आणि औदुंबरअण्णा पाटील यांच्यात राजकीय दुही निर्माण झाली होती. यामध्ये आमदार भारत भालकेंनी काळे यांचे नेतृत्व मान्य करत कामाला सुरवात केली. काळे यांच्या निधनानंतर आमदार भारत भालके यांनी 2002 साली विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद स्वतःकडे घेतले. तेथूनच त्यांनी आमदार होण्याचे स्वप्न पाहिले. 

जो विठ्ठल कारखान्याचा अध्यक्ष तो तालुक्‍याचा आमदार अशी म्हणच त्या वेळी तालुक्‍यात रूढ झाली होती. त्यानुसार आमदार भालकेंनी कामाला सुरवात केली. 2004 साली पहिल्यांदा त्यांनी विठ्ठल परिवाराच्या झेंड्याखाली विधानसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला. तरीही त्यांनी पराभव खिलाडू वृत्तीने स्वीकारून पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरवात केली. कामाच्या जोरावर आणि दांडग्या लोकसंपर्कामुळे त्यांनी 2009 साली माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांचा धक्कादायकरीत्या परावभ केला होता. त्यावेळी त्यांना मुंबईला नेण्यासाठी कॉंग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण यांनी खास हेलिकॉप्टर पाठवले होते. 

कोल्हापूरच्या लाल मातीत मिळाले राजकीय धडे 
पंढरपूर तालुक्‍यातील सरकोली येथे 1960 साली त्यांचा शेतकरी कुटुंबात जन्म झाला. त्यांचे चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण सरकोली येथील प्राथमिक शाळेत झाले. द. ह. कवठेकर प्रशालेत त्यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. शिक्षणाबरोबरच पैलवानकी करण्यासाठी ते कोल्हापूर येथे गेले. कोल्हापूरच्या गंगावेस तालमीत पैलवानकीचा सराव सुरू केला. तिथेच त्यांना राजकारण आणि समाजकारणाची आवड निर्माण झाली. यशवंतराव चव्हाण आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा पगडा होता. 

कोल्हापूरच्या तालमीतून आल्यानंतर त्यांनी राजकारण आणि समाजकारणाला सुरवात केली. माजी मंत्री (कै.) प्रतापसिंह मोहिते- पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पंढरपूर तालुक्‍यात जनसेवा संघटनेचे काम सुरू केले. पुढे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद मिळवून देण्यात प्रतापसिंहांचा मोठा वाटा होता. 

सलग 18 वर्षे "विठ्ठला'च्या अध्यक्षपदाची धुरा ! 
(कै.) वसंतराव काळे यांच्या निधनानंतर 2002 साली आमदार भारत भालकेंची गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड झाली. गेल्या अठरा वर्षांपासून ते अध्यक्ष म्हणून काम पाहात होते. त्यांच्या कार्यकाळात कारखान्याच्या विस्तारीकरणाबरोबरच को-जन, डिस्टिलरी आणि इथेनॉल निर्मिती प्रकल्प सुरू झाले. "फक्त जमीन तुमची; खत, बेणे आणि ड्रीप कारखान्याचे' अशी सभासदांसाठी राबवलेली अभिनव योजना त्याकाळी खूप चर्चेची ठरली होती. आक्रमक भाषण शैलीमुळे ते नेहमीच तालुक्‍याच्या राजकारणात चर्चेत होते. 

अलीकडेच कारखान्याचा गाळप हंगाम सुरू करण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची खूप गरज होती. राज्य सरकारची थकहमी मिळत नसल्याने आर्थिक कोंडी झाली होती. बॅंकांच्या आणि राज्य सरकारच्या नवीन धोरणानुसार कारखान्याला थकहमी मिळणे अशक्‍य होते. तरीही आमदार भालके यांनी शरद पवार यांच्याकडे सतत पाठपुरावा करून शासनाकडून थकहमी मिळवून घेतली. राज्य सरकारला देखील आपल्या नियमात बदल करणे भाग पाडले. त्यानंतर राज्यातील सुमारे 21 साखर कारखान्यांना राज्य सरकारची थकहमी मिळाली. त्यानंतर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com