मोहोळ तालुका पंचायत सामितीला 1.41 कोटीचा निधी प्राप्त; सदस्य करणार निधीचा वापर अतिवृष्टीग्रस्तांसाठी 

Rupees
Rupees

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ तालुका पंचायत समितीला पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून एक कोटी 22 लाख तर सेस फंडातून 19 लाख असा एकूण एक कोटी 41 लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. पंचायत समिती सदस्याला यापैकी जो निधी विकासकामांच्या खर्चासाठी मिळणार आहे तो निधी अतिवृष्टी व पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी योजनांच्या माध्यमातून वापरावा, असा महत्त्वपूर्ण ठराव पंचायत समितीच्या बैठकीत सर्वानुमते करण्यात आला. अशा प्रकारचा ठराव जिल्ह्यात प्रथमच मोहोळ पंचायत सामितीने केला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे पंचायत समितीतील गटनेते ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली. 

मोहोळ तालुका पंचायत समितीची मासिक सभा नुकतीच पार पडली. त्यात अनेक महत्त्वपूर्ण ठराव झाले असून, विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. प्राप्त झालेल्या एक कोटी 22 लाखांच्या निधीतील निम्मा निधी हा पाणीपुरवठा, स्वच्छता व आरोग्यावर खर्च करणे बंधनकारक आहे. तर सेस फंडाच्या निधीतून प्राप्त झालेल्या 19 लाखांपैकी प्रत्येक सदस्याला जी रक्कम विकासकामांसाठी वाट्याला येईल ती रक्कम तालुक्‍यात पुराच्या पाण्याने व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खर्च करावी, असा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. वैयक्तिक लाभाच्या योजना असतील त्याचाही जास्तीत जास्त लाभ महिला व पुरुष शेतकऱ्यांनाच देण्यात येणार आहे. या बैठकीत कोरोनाची सद्य:स्थिती व विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या वेळी गटविकास अधिकारी गणेश मोरे यांच्यासह पंचायत सामिती सदस्य उपस्थित होते. 

प्रशासकीय अधिकाऱ्यांची अनुपस्थिती 
बैठकीसाठी वेळेत अजेंडा देऊनही फोन करून सांगूनही महावितरण, सार्वजनिक बांधकाम, तालुका कृषी विभाग, ग्रामीण रुग्णालय, भूमी अभिलेख या विभागांचा एकही अधिकारी बैठकीला उपस्थित नव्हता. तालुक्‍यात सध्या बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरू आहेत. बैठकीला उपस्थित राहून वरील सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी आढावा व माहिती देणे अपेक्षित होते; मात्र तसे झाले नाही. त्यामुळे आमची पोती ओळखल्याची भावना पंचायत समिती सदस्यांची झाली आहे. 

मोहोळचे गटविकास अधिकारी गणेश मोरे हे स्वतः कार्यालयात जेवतात, मात्र इतर विभागांचे अधिकारी जेवायला गेल्यानंतर किमान दीड ते दोन तास तरी येत नाहीत. त्यामुळे कामासाठी लांबून आलेल्या नागरिकांना तिष्ठत थांबावे लागते. हे चित्र गटविकास अधिकारी मोरे यांनी बदलणे गरजेचे आहे. 

याबाबत गटविकास अधिकारी श्री. मोरे म्हणाले, जेवायला फार फार तर अर्धा तास खूप झाला. मात्र जे अधिकारी उशीर लावत असतील त्यांच्यावर निश्‍चित कारवाई करू. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com