
केत्तूर (सोलापूर) : मागील वर्षभरात कोरोना महामारीच्या संकटामुळे हाताला न मिळालेले काम, त्याचबरोबर अनेकांच्या गेलेल्या नोकऱ्या यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील महावितरणच्या ग्राहकांनी जवळजवळ वर्षभर महावितरणचे वीजबिल भरले नाही. त्यामुळे वरचेवर थकीत बिल वाढतच आहे. ही थकबाकी न भरल्याने थेट कनेक्शन तोडण्याची कारवाई महावितरण करणार आहे. दरम्यान, या कारवाईच्या आदेशामुळे महावितरणच्या ग्राहकांनी मात्र धास्ती घेतली आहे.
गेल्या वर्षभरात कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळित झाले होते. त्यामुळे वीज ग्राहकांची थकबाकी वरचेवर वाढतच गेली. त्यातच विविध राजकीय पक्षांनी या काळातील वीजबिल माफ करण्याची मागणी केली असल्याने वीजबिल माफ होईल, या आशेने वीज ग्राहकांनी मात्र वीजबिले भरलीच नाहीत. महावितरण कंपनीला मात्र देखभाल व दुरुस्तीचा खर्च भागवण्यासाठी आता अडचणी निर्माण झाल्याने व थकबाकीदारांनी थकीत वीजबिले भरावी नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा वीज वितरण कंपनीने ग्राहकांना वारंवार आवाहन करूनही ग्राहक वीजबिले भरत नसल्याने महावितरणचे मात्र दिवाळे निघू लागले आहेत.
वस्तुतः कोरोना लॉकडाउनच्या काळात ग्रामीण तसेच शहरी भागात सर्व लोक घरीच होते. काहीही कामधंदा नव्हता, त्यामुळे विजेचा वापरही नेहमीपेक्षा जवळजवळ दुपटीने वाढला होता. या काळात टीव्ही, फॅन, फ्रीज, कूलर, एसी यासह लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाईल आदी विजेवर चालणाऱ्या वस्तू 24 तास चालू राहिल्या होत्या व त्याचा सर्रास वापर वाढला होता. त्यामुळे नेहमी येणाऱ्या वीजबिलापेक्षा कोरोना लॉकडाउन काळात वीजबिल जास्त येणारच होते, हे मात्र सर्वसामान्यांच्या लक्षात आले नाही. या काळात विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला होता, हेही खरे आहे.
जे ग्राहक नियमित वीजबिल भरणा करतात त्यांना कधीही कसलीही सवलत मिळत नाही. त्यांचा कोणत्याही बाबतीत विचारही केला जात नाही. त्यामुळे नियमित वीजबिल भरणा करणाऱ्यांचाही विचार सवलतीच्या बाबतीत होणे गरजेचे.
- मनोज कटारिया,
वीज ग्राहक
कोरोना महामारीच्या काळातील वीजबिलात सवलत देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन होता. त्याचा मोठा गाजावाजाही झाला होता. परंतु, राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट पाहता हा निर्णय बासनात गुंडाळला गेला.
- अशोक पाटील,
केत्तूर
वीजबिल माफ करावे, त्यात सूट द्यावी अशी मागणी मध्यंतरी केली जात होती. त्यातच राजकारणी मंडळींनी कोरोना काळातील वीजबिल भरू नका, असे सांगितल्याने ग्राहकांची मात्र गोची झाली व वीजबिल न भरल्याने त्याची थकबाकी मात्र वरचेवर वाढत गेली. आता बिल भरण्याचा तगादा वीज वितरण कंपनीकडून केला जात आहे.
- श्रीकांत साखरे,
ग्राहक, राजुरी
वीज बिल भरू नका असे म्हणणारे राजकारणी मात्र आता गप्प बसले आहेत.
- विलास खुळे,
ग्राहक
डिसेंबर 2020 पर्यंत तसेच कोरोना काळातील थकबाकी आणि चालू विजबिलाची वसुली होणार असून, ग्राहकांनी टप्प्या टप्प्याने आपले वीजबिल भरून वीज वितरण कंपनीला सहकार्य करावे. वारंवार आवाहन करूनही वीजबिल भरले जात नसल्याने आता शेवटचा पर्याय म्हणून थकबाकीदारांची वीजजोडणी नाइलाजास्तव तोडण्यात येणार आहे. तसेच शासनाने कृषी बिलासंदर्भात कृषी योजना 2020 अंतर्गत 50 टक्के वीजबिल माफ करण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेऊन वीजबिल भरून सहकार्य करावे.
- रघुनाथ शिंदे,
सहाय्यक अभियंता, महावितरण, केत्तूर कार्यालय
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.