विदेशातुन आलेली झाडे नको...का ते जाणून घ्या

images.jpg
images.jpg

सोलापूरः पावसाळा तोंड़ावर आला की अंगण व मोकळ्या जागामध्ये झाडे लावण्याची लगबग सूरू होते. मात्र झाडे लावताना फळझाडे व किटक व पक्ष्यांची जैवसाखळी तयार करणारी झाडे निवडण्याची वेळ आली आहे. कारण आता विदेशातून आलेल्या झाडांनी ही जैवविवीधता निर्माण न करता केवळ जागा व्यापण्याचे काम केले आहे. म्हणून आता झाडांची निवड जागरूकपणे केली पाहीजे. 

मादागास्कर येथून भारतात आलेला गुलमोहर, ऑस्ट्रेलियातून आलेले निलगिरी, आयात केलेल्या गव्हाबरोबर सुबाभूळ, पेल्ट्रोफोरम, अकेशिया, स्पॅथोडिया, कॅशिया, ग्लिरिसिडीया, फायकस, सप्तपर्णी, रेन ट्री या झाडांनी आज हजारो एकरांवर डेरा जमवून आपल्या आम्लयुक्त पानांमुळे आपल्या आसपासची जमीन नापीक केली आहे. 
अशा प्रकारे विदेशी झाडांची केलेली लागवड आपल्या जीवनचक्रावर परिणाम करत असल्याचे दिसत आहे. या झाडांच्या फुलात परागकण नाहीत त्यामुळे त्यावर फुलपाखरासारखे कीटक येत नाहीत.

या झाडांच्या मुळांनी जमिनीतील पाणी शोषून घेतल्याने पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या झाडांच्या पानांनी आणि सावलीने आपल्या जमिनी निकृष्ट केलेल्या आहेत. या झाडांच्या फांद्यांचा, बुंध्यांचा उपयोग आपल्याला नाही. रातकिडे, वटवाघूळ, चिमणी, घार, गिधाडे, गरुड, घुबड अशा सर्रास दिसणाऱ्या पक्षांचा वावर दुर्मिळ झाला आहे. 

एकंदरीत अशा विदेशी झाडांवर होणाऱ्या परागकण प्रक्रियेला आणि पक्ष्यांद्वारे होणाऱ्या बीजप्रसाराच्या कामाला खीळ बसत असून कीटक, मधमाशी, किडे, पक्षी जोडणारी निसर्गसाखळी किंवा अन्नसाखळी कमकुवत होतेय. यातील अनेक झाडांची पाने, फुले, शेंगा जनावरे देखील खात नाहीत. मुक्‍या प्राण्यांना जे कळते की परदेशी झाडे घातक आहे ते आपल्याला अजून कळलेले नाही हेच मोठे दुर्देव आहे. याचमुळे निसर्गाच्या अन्नसाखळीत एकमेकांवर अवलंबून असलेले अनेक जीव नामशेष होण्याच्या मार्गाकडे ढकलले जात आहेत. 
जवळपास सरकारी जंगले व नर्सरी ग्लिरिसिडीयाने भरलेली आहेत. तेव्हापासून पावसाचे प्रमाण हळुहळु कमी झालेले आहे. फायकस या झाडाच्या पानाचा धुर घेतल्यास शरीर सुजते. या झाडांचे फारसे आयुर्वेदीक उपयोग नाहीत. इतक्‍या मोठ्या प्रमाणावर परदेशी झाडे लावली गेली आहेत आणि त्यांना नीलमोहोर, काशीद, सप्तपर्णी अशी स्थानिक दिशाभुल करणारी नावे दिलेली आहेत. ज्या झाडांवर पक्षी बसत नाहीत आणि घरटी करत नाहीत ते झाड परदेशी समजावे. 
देशी वृक्ष आपल्या जंगलात किंवा स्थानिक हिरव्या पट्टयात पर्यावरणाचा समतोल साधत असतात. त्यांच्या अस्तित्वाशी जुळवून घेतलेली, त्यावर जोपासली जाणारी जैव साखळी जाते. या जैव साखळीमध्ये मनुष्य, प्राणी, पक्षी, कीडे, कीटक सामावलेले असतात. 
पक्ष्यांना, किडयांना आणि कीटकांनाही अन्न, निवारा मिळतो. देशी झाडांच्या गळलेल्या पानांतून जमिनीवर जमणाऱ्या पाचोळयातून तयार होणाऱ्या खतातून जमिनीचा कस वाढत असतो. विघटन झालेल्या पालापाचोळयाच्या खतातून निर्माण होणारी पोषकद्रव्ये पुन्हा झाडाकडे पाठवण्याचे काम झाडांची दूरवर पसरणारी मुळे करतात. ही मुळे खोलवर जाऊन ती जमिनीवरच्या मातीला धरून ठेवतात. विविध कीटकांना, किडयांना आणि सरपटणाऱ्या जीवांना अशी उत्तम जमीन उपयुक्त ठरते आणि एक परिपूर्ण पर्यावरण निर्माण करते. 
देशी झाडांचे प्रमाण कमी झाल्याने अवकाळी पाउस, चुकलेले उन्हाळा, पावसाला, थंडी यांचे चक्र वाढते. देशी झाडांच्या फांद्या, ढोल्या या विविध पक्ष्यांचा निवारा बनतात. आंबा, जांभूळ, चिकू, बोर, उंबर, वड, पिप्रण, नांदरूक, मोहा, सीताफळ, रामफळ अशी अनेक फळझाडे असून सर्वात अगोदर फळ पिकते हे वटवाघळाला समजते. यात पाडाला पिकलेला आंबा सुरुवातीला वटवाघळे खातात आणि मग शेतकरी आंबे उतरवितो आणि मग आडी लावली जाते. 

देशी फळझाडे सर्वात उपयुक्त 
पांगरा, सावर, सिताफळ, जांभुळ, कोकम, कडुनिंब, करंज, बहावा, उंबर, वड, पिंपळ, चिंच, आपटा, कांचन, बहावा, कदंब, फणस ,आवळा ,आंबा , कवठ, बेल,कडुनिंब मोह, पळस ही झाडे लावली पाहिजेत.

- सुहास हरिश्‍चंद्र भोसले, खजिनदार, निसर्ग माझा सखा मंडळ. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com