कोरोनाची नव्हे तर "याची' आहे शेतकऱ्यांमध्ये दहशत; लाखोंचा खर्च वाया, तरीही प्रभावी औषध नाहीच !

Telya
Telya

सलगर बुद्रूक (सोलापूर) : जागतिक आरोग्य संघटनेने वैश्विक महामारी म्हणून कोरोना विषाणूला घोषित केले. त्यामुळे गेल्या चार-पाच महिन्यांपासून शेतकऱ्यांसह सर्वांचे जगणे मुश्‍किलीचे झाले आहे. पण गेल्या दोन दशकांपासून शेतकऱ्यांना तेलकट डाग म्हणजेच तेल्या या डाळिंबावर नुकसान करणाऱ्या विषाणूने भांबावून सोडले आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोनोना महामारीपेक्षाही तेल्या रोगाच्या व्हायरसचा धोका खूप मोठा वाटू लागला आहे. 

चालू वर्षीच्या मॉन्सून हंगामात सुरवातीला समाधानकारक पाऊस झाल्यामुळे सर्व डाळिंब उत्पादकांनी डाळिंबाचा मृग बहार मोठ्या जोमात धरला. त्यासाठी डाळिंबावर लाखो रुपयांचा खर्चही केला. पण गेल्या दोन आठवड्यांपासून वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणावर तेल्या व्हायरसचा ऍटॅक डाळिंबाच्या फळांवर झालेला आहे. डाळिंबाच्या बागाच्या बागा तेल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे नुकसानग्रस्त झालेल्या आहेत. त्यामुळे कोरोना महामारीपेक्षाही शेतकऱ्यांना तेल्या रोगाच्या व्हायरसचा धोका अधिक वाटू लागला आहे. 

2009 नंतर अनुदान बंद 
आघाडी सरकारच्या काळामध्ये 2007, 2008 व 2009 या वर्षी डाळिंबावरील तेलकट डाग रोगामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी अनुदान दिले जात होते. त्यामुळे काहीअंशी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आधार मिळत होता. पण पुढे 2009 नंतर तेल्या रोगावर येणारे अनुदान बंद झाल्यामुळे राज्य सरकार शेतकऱ्यांप्रति किती गांभीर्याने विचार करते, याची जणू पोचपावती शेतकऱ्यांना मिळाली आहे. 

डाळिंब संशोधन केंद्राचे धोरण उदासीन 
डाळिंब उत्पादकांचा जिल्हा म्हणून राज्यामध्ये सोलापूरचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. म्हणूनच सोलापूर येथे डाळिंब संशोधन केंद्राची निर्मिती झालेली आहे. डाळिंब संशोधन केंद्र असून देखील तेल्या रोगावर आजपर्यंत कोणतेच ठोस प्रभावी औषध निघाले नसल्याने दरवर्षी तेल्या रोगामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान वाढतच आहे. त्यामुळे डाळिंब संशोधन केंद्र असून अडचण नसून खोळंबा अशी गत झाली आहे. 

शेतकऱ्यांना पॅकेजची गरज 
सोलापूर जिल्ह्यामध्ये डाळिंब लागवडीखालील क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे या डाळिंबावर उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही खूप मोठी आहे. पण दरवर्षी तेल्या रोगामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे आघाडी सरकारच्या काळामध्ये तेल्या रोगामुळे नुकसानग्रस्त डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना ज्याप्रकारे अनुदान मिळत होते, तशाच प्रकारच्या अनुदानाच्या पॅकेजची आवश्‍यकता सद्य:स्थितीत असून, सरकारकडून शेतकरी महाविकास आघाडी अशा अनुदानाची अपेक्षा करत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com