सोलापुरात लॉकडाउन! शेतकरी आणि ग्राहकांच्या मध्ये व्यापाऱ्यांमुळे भाजीपाल्यांचे दर वाढले एवढे... 

Vegitable
Vegitable

सोलापूर : शहरातील कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्याच्या हेतूने 16 ते 26 जुलै या काळात कडक लॉकडाउन केला जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजीपाला खरेदीसाठी बाजारांमध्ये ग्राहक अन्‌ विक्रेत्यांची मोठी गर्दी होत आहे. दरम्यान, दहा दिवसांच्या कडक लॉकडाउनमध्ये घरातच बसावे लागणार असल्याने ग्राहकांकडून पालेभाज्यांचा साठा करून ठेवला जात आहे. दुसरीकडे, पालेभाज्यांचे दर दुप्पट झाल्याचा अनुभव गृहिणींना आला. 

राज्यात 23 मार्चपासून लॉकडाउन असून जिल्हाबंदीचा निर्णय अद्यापही कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळेल त्या ठिकाणी पालेभाज्या तथा शेतमाल विकावा लागत आहे. शहरात महापालिकेच्या वतीने 21 ठिकाणी भाजीपाला विक्रीची ठिकाणी निश्‍चित करून देण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शहरात 16 जुलैपासून कडक लॉकडाउनचा निर्णय घेतल्यानंतर आता एकच दिवसाचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे किराणा दुकानात व भाजी मार्केटमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड लागली आहे. सोशल डिस्टन्सचे सर्रासपणे उल्लंघन करीत ग्राहक विविध वस्तू खरेदी करीत आहेत. 

याबाबत गृहिणी सुवर्णा बोरगावकर म्हणाल्या, शहरात पुन्हा दहा दिवसांचा कडक लॉकडाउन होणार असल्याने भाजी मार्केटमध्ये मोठी गर्दी झाली आहे. तर दुसरीकडे भाजीपाल्याचे दर दुप्पटच झाल्याचा अनुभव आला. ग्राहक दहा दिवसांचा साठा करू लागल्याने दर वाढविण्यात आले आहेत. 

वंदना हबीब म्हणाल्या, सोलापूरसह राज्यात यापूर्वीही कडक लॉकडाउन झाला होता. आता शहरात पुन्हा दहा दिवसांचा लॉकडाउन होणार असल्याने घराबाहेर पडता येणार नाही म्हणून मोठी गर्दी बाजारपेठांमध्ये झाली आहे. मेथी, टोमॅटो, बटाटा, कांदे अशा पालेभाज्यांचे दर खूपच वाढल्याने दुप्पट पैसे द्यावे लागले. 

ज्योती पाटील म्हणाल्या, प्रत्येकवेळी पिशवीभर पालेभाज्यांसाठी शंभर ते दोनशे रुपये लागत होते. मात्र, आता दर वाढल्याने चारशे ते साडेचारशे रुपये मोजून पालेभाज्या खरेदी कराव्या लागल्या. लॉकडाउन काही दिवसांतच असल्याने ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करू नये. 

रोहिणी चौधरी म्हणाल्या, एरव्ही मेथी, पालक, शेपू, टोमॅटो, बटाटा, कांदे, आद्रक-लसूण, दोडके या पालेभाज्यांचे दर समाधानकारक होते. मात्र, शेतकऱ्यांकडून स्वस्तात माल घेऊन व्यापारी दुप्पट दराने शेतमालाची विक्री करीत आहेत. ग्राहकांनीही लॉकडाउन होणार असल्याने मोठी गर्दी केल्याचा फायदा त्यांच्याकडून घेतला जात आहे. 

शुभदा पोटाबत्ती म्हणाल्या, शहरात 16 जुलैपासून कडक लॉकडाउन होणार असल्याने बाजारांत ग्राहकांची गर्दी वाढली आहे. गर्दी होईल म्हणून पालेभाज्या खरेदी करून ठेवल्या. परंतु, मागील दहा-पंधरा दिवसांच्या तुलनेत आता पालेभाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. 

छाया आगाजे म्हणाल्या, शेतकरी आणि ग्राहक यांच्यात व्यापाऱ्यांची दलाली वाढली आहे. मंगळवारी पालेभाज्या खरेदी करताना त्याचा अनुभव आला. एरव्ही पाच ते सात रुपयाला मिळणारी मेथी, पालकचे दर दुप्पट झाले असून, टोमॅटो, कांदा, बटाटा यासह अन्य भाजीपाल्यांचेही दर खूपच वाढले आहेत. 

मंगळवारचे पालेभाज्यांचे प्रतिकिलो दर 

  • टोमॅटो : 50 ते 80 रुपये 
  • बटाटा : 40 ते 60 रुपये 
  • कांदा : 20 ते 30 रुपये 
  • आद्रक : 100 ते 180 रुपये 
  • मेथी, पालक : 10 ते 15 रुपये 
  • दोडके : 55 ते 65 रुपये 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com