निम्मी लढाई जिंकली! सोलापुरात अद्याप एकही नाही कोरोनाचा रुग्ण 

There is no Corona patient in Solapur
There is no Corona patient in Solapur

सोलापूर : अख्खं जग कवेत घेत असलेल्या कोरोनाचा सोलापुरात अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. दररोज रुग्णांची संख्या वाढत असल्याने देश धास्तावला आहे. त्याला रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून सध्या लॉकडाउन सुरू आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकार नागरिकांना "घरातच बसा, बाहेर पडू नका,' असे आवाहन करत आहे. महाराष्ट्रात पुण्यात पहिला रुग्ण सापडला. तेव्हापासून सरकार त्याला रोखण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी दिलेल्या प्रत्येक आदेशाची सोलापुरात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी केली. इतर कारणांबरोबर रुग्ण न सापडण्यास तेही महत्त्वाचे कारण आहे. 

कोरोना व्हायरसचा संसर्ग महाराष्ट्रातही वेगाने वाढत आहे. दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पहिला रुग्ण पुण्यात सापडला होता. आता मुंबईत सर्वांत जास्त रुग्णांची संख्या आहे. पुणे, सातारा, अहमदनगर, उस्मानाबाद आणि सांगली या जिल्ह्यांच्या मध्ये सोलापूर आहे आणि या सर्व जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण आहेत. खबरदारी म्हणून सोलापूर जिल्ह्यात सुरवातीपासूनच योग्य ती काळजी घेण्यात आली. सरकारचा आदेश आल्याबरोबर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जिल्ह्याच्या सीमा सील करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर सर्व सीमा बंद करण्यात आल्या. सोलापूर जिल्ह्यात करमाळा, मंगळवेढा, माळशिरस, बार्शी, माढा, अक्कलकोट, सांगोला, दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर हे तालुके सीमेवर आहेत. येथील पोलिस निरीक्षक आणि तहसीलदार यांनीही यासाठी परिश्रम घेतले. 24 मार्चला मध्यरात्री करमाळ्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे व मंद्रूप पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप धांडे यांच्यासह सर्व तालुक्‍यांतील पोलिसांनी बाहेरून येणाऱ्या सीमा त्वरित सील केल्या. त्यानंतर नागरिकांनी सजग होऊन अनेक गावंही बंद केली. नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्‍यात रुग्ण सापडल्यानंतर तर या भागातील आळजापूर, पाडळी, जातेगाव येथे येणारे रस्ते बंद करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला. कितीही जवळचा असला तरीही त्याला प्रवेश नाही म्हणजे नाही, असा पवित्रा घेतला. अशीच स्थिती सर्व गावांमध्ये झाली. त्याचा बराचसा परिणाम रुग्ण न सापडण्यावर झाला आहे. 

पालकमंत्र्यांचाही हाच आदेश... 
सोलापूरचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नुकताच सोलापूर दौरा केला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात व्हेंटिलेटरबाबत प्रश्‍न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना त्याची गरजच भासणार नाही यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यानंतर कोरोनाला रोखण्यासाठी घरात बसणे हा एकच उपाय असल्याचे सांगत, जिल्हाबंदीची आणखी प्रभावी अंमलबजावणी करण्याची सूचना केली. 

का घाबरतात कोरोनाला... 
पालकमंत्री आव्हाड म्हणाले, कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी गर्दी न करणे हाच एकमेव उपाय आहे. बाहेरच्या गावातून कोणीही आला तरी त्याची तपासणी करा. त्याची माहिती प्रशासनाला द्या. याची तपासणी पूर्णत: मोफत होते. यावर अद्याप औषध सापडलेले नाही. त्यामुळे न घाबरता काळजी घेणे हाच एकमेव उपाय आहे. 

सोलापुरातील अशी स्थिती... 
- होम क्वॉरंटाइन झालेल्या एकूण व्यक्ती : 490 
- क्वॉरंटाइन पूर्ण केलेल्या व्यक्ती : 370 (14 दिवस कालावधी पूर्ण) 
- होम क्वॉरंटाइनमध्ये असलेल्या : 120 (हाताला शिक्के लावलेले) 
- इन्स्टिट्यूशनल व्यक्ती 168, त्यापैकी 54 कालावधी पूर्ण केलेल्या, 114 व्यक्ती अद्यापही इन्स्टिट्यूशनलमध्ये 
- आयसोलेशन वॉर्डमध्ये 124 रुग्ण, तपासणी पूर्ण केलेल्या 95 व्यक्ती (तपासणी पूर्ण निगेटिव्ह), 29 व्यक्तींचे रिपोर्ट बाकी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com