Sangli News : शासनाच्या जन आरोग्य योजनेतील रुग्णालयांचे ५० कोटी रुपये थकले

शासनाच्या जन आरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांचे परताव्याचे गेल्या सहा महिन्यापासून तब्बल ५० कोटी रुपये थकले आहेत.
Money
Moneysakal
Updated on

सांगली - शासनाच्या जन आरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांचे परताव्याचे गेल्या सहा महिन्यापासून तब्बल ५० कोटी रुपये थकले आहेत. त्यामुळे रुग्णालये आर्थिक अडचणीत असून योजनेंतर्गत रुग्णांवर उपचार कसे करायचे, अशा विवंचनेत रुग्णालये आहेत.

शासनाने राज्यातील गोर गरीब रुग्णांवर मोफत आरोग्य उपचार करण्यासाठी 'पंतप्रधान जनआरोग्य' व 'महात्मा फुले जनआरोग्य' या दोन्ही योजना एकत्रित करून पाच लाखांपर्यंतच्या खर्चाचे उपचार मोफत देण्याची घोषणा केली आहे. मात्र गेल्या जुलैपासून या योजनेत समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील ६७ रुग्णालयांचा तब्बल जवळपास ५० कोटी रुपयांचा परतावा रखडला आहे.

राज्यातील रुग्णालयाचे ११०० कोटी थकले

जिल्ह्यातील रुग्णालयांचे ५० कोटी रुपये अडकले आहेत त्याचबरोबर या योजनेत समाविष्ट असलेल्या राज्यातील रुग्णालयांचे तब्बल ११०० कोटी रुपये अडकले आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी या परताव्याची तरतूद व्हावी अशी रुग्णालयांची अपेक्षा आहे.

६७ रुग्णालयांमध्ये योजना

दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात या योजनेंतर्गत ३८ अंगीकृत रुग्णालये होती. त्यात दोन सरकारी रुग्णालये होती. मात्र आता सर्व ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहेत. शिवाय नवीन रुग्णालयांचा योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण ६७ रुग्णालये या योजनेत समाविष्ट आहेत. तर १३५७ आजारांचा समावेश करण्यात आला आहे.

गंभीर आजारांचा समावेश

या योजनेत कर्करोग, हृदयरोग, हाडांच्या शस्त्रक्रिया, मूत्रपिंडाचे आजार अशा गंभीर आजारांवर उपचार केले जातात. त्यावरील उपचारांचा खर्चही महाग असून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. मात्र या योजनेंतर्गत उपचारामुळे सर्वसामान्यांना मोफत उपचार मिळत आहेत.

दोन वर्षांपूर्वीही जन आरोग्य योजनेतील रुग्णालयांची बिले थकली होती. त्यावेळीही रुग्णालय आर्थिक अडचणीत आली होती. यंदा तीच परिस्थिती ओढवली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून परताव्याचे अनुदान थकल्यामुळे रुग्णालयांना या योजनेत उपचार करणे अवघड झाले आहे. त्यामुळे काही वेळा महागड्या उपचारासाठी रुग्ण योजनेत घेण्यास टाळाटाळ केली जात आहे.

पदरमोड करण्याची वेळ

रुग्णांवर मोठ्या उपचारांचा खर्च करताना रुग्णालयांना शस्त्रक्रियेसाठी बाहेरून भूलतज्ज्ञ, तसेच स्पेशालिस्ट डॉक्टरांना बोलवावे लागते. त्याचबरोबर रुग्णांसाठी अन्यही खर्च करावा लागतो. यातील भुलतज्ज्ञ तसेच स्पेशलिस्ट डॉक्टरांचा खर्च तातडीने द्यावा लागतो. शिवाय रुग्णांसाठी जेवणाची सोय त्यांच्या औषधाची सोय तसेच घरी परत जाण्यासाठीचा खर्च हा डॉक्टरांना द्यावा लागतो. यासाठी सध्या डॉक्टरांना पदरमोड करावी लागत आहे. हा सर्व खर्च परत मिळेपर्यंत रुग्णालयांना आर्थिक जुळवाजुळव करावी लागत आहे.

गेल्या पाच सहा महिन्यांपासून जनआरोग्य योजनेतील रुग्णालयांचे परतावे रखडलेत हे वास्तव आहे. जिल्ह्यातील रुग्णालयांचे जवळपास ५० कोटी रुपये थकले आहेत. मात्र थकित अनुदानासाठी राज्यस्तरावर पाठपुरावा सुरू आहे.

- डॉ. सुभाष नांगरे, समन्वयक, महात्मा फुले जन आरोग्य योजना, सांगली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com