गाफील भाजपला नियोजनबद्ध अरुण लाड यांनी धडा शिकवला 

Arun Laad taught a lesson to BJP with Planning
Arun Laad taught a lesson to BJP with Planning

सांगली ः पाच जिल्हे, दोन कोटी लोकसंख्या, 57 विधानसभा मतदारसंघ आणि साडेनऊ लोकसभा मतदारसंघाचा पसारा असलेल्या पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघातून आमदार म्हणून कुंडलचे अरुण लाड यांच्या एकतर्फी विजयाला आता अनेक परिमाणं लावली जाऊ शकतील. या कारणमीमांसेनंतरही... जिंकायचंच या इराद्याने गेल्या निवडणुकीत पराभूत झाल्यापासून त्यांनी केलेली पक्की तयारी हे कारण सर्वाधिक वरचढ ठरेल. या मतदारसंघावर संघ परिवाराने ज्या हुशारीने आपले वर्चस्व राखले होते तेच कसब डाव्या चळवळीचा वारसा असलेल्या लाड यांनी दाखवले. त्यांनी मिळवलेलं सुमारे 49 हजारांचे मताधिक्‍य हे त्यांना महाविकास आघाडीतील तीन समर्थ पक्षांनी दिलेल्या बळाचे दृष्यरूप आहे. 

पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघाची यंदाची लढत यावेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी विरुद्ध पश्‍चिम महाराष्ट्रात घट्ट पाय रोवून उभा राहिलेला भाजप अशी अत्यंत चुरशीची होती. कधी नव्हे ते ही निवडणूक एखाद्या सार्वत्रिक विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुकीसारखी भासत होती. वारेमाप खर्च, भव्य फ्लेक्‍स जाहिराती, प्रसिद्धीवरील दिपवून टाकणारा खर्च, नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी या गदारोळात ही निवडणूक राजकीय पक्षांमधील अक्षरक्षः दंगल झाली. गतवर्षी झालेल्या राज्यातील सत्तांतराची फोडणी या निवडणुकीला होती. त्यानिमित्ताने या नव्या सत्तासमीकरणाची भविष्यातील लढतींची रंगीत तालीमही होती. 

खरे तर सांगली, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या पाचही जिल्ह्यांमध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे परंपरागत साम्राज्य. मात्र या हत्तीला मुंगीच्या ताकदीच्या भाजपने गेली तीस वर्षे या मतदारसंघात कायम बॅकफुटवर ढकलले होते. त्यामागे भाजपचे पक्के संघटनात्मक यश होते. मतदार नोंदणी हेच या निवडणुकीचे सर्वात मोठे बलस्थान असते. त्यात माहिर भाजपचा कित्ता गेल्या दोन-तीन निवडणुकांमध्ये केवळ पक्षाच्याच नव्हे तर अन्य अपक्ष आणि छोट्या छोट्या संघटनांनी गिरवला होता. तब्बल 62 उमेदवार रिंगणात होते. मात्र ही लढत महाविकास आघाडीचे लाड आणि भाजपचे संग्राम देशमुख यांच्यातच होणार हे पहिल्यादिवशीपासून स्पष्ट होते. जे पूर्वी कॉंग्रेस आघाडीचे व्हायचे ते यावेळी निष्काळजीपणामुळे भाजपचे झाले आहे. आधी कॉंग्रेसचा उमेदवार अर्ज दाखल होण्याच्या आदल्यादिवशीपर्यंत ठरायचा नाही.

यावेळी भाजपकडून लढायचे कोणी यावरच एकमत होत नव्हते. कधी नव्हे तेवढी सत्ताकेंद्रे पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपच्या हाती असतानाही ही अवस्था होती. खरे लाड यांनी पक्षाची उमेदवार मिळो अथवा न मिळो आपली तयारी सुरुच ठेवली होती. लाड यांची उमेदवारी समोर कायम असल्यानेच त्यांना होमग्राऊंडमध्ये झुंजवण्यासाठी संग्राम यांच्या रुपाने भाजपने मराठा कार्ड बाहेर काढले होते. मात्र त्यासाठीचा पुरेसा होमवर्क मात्र देशमुख यांच्याकडे आणि भाजपकडेही नव्हता. पश्‍चिम महाराष्ट्रात इतकी ताकद वाढल्यानंतर उमेदवारीबाबत करावी लागलेली ही तडजोडच भाजपच्या लढतीतील मर्यादा स्पष्ट करणारी होती. 

सूत्रबद्ध मतदार नोंदणीला हत्तीचे बळ मिळाले ते राज्यातील सत्तांतराचे. गतवेळचे राष्ट्रवादीचे उमेदवार सारंग पाटील यांनी माघार घेतल्यानंतर लाड यांचा उमेदवारीचा मार्ग बराचसा मोकळा झाला. श्रीमंत कोकाटे यांचे नाव राष्ट्रवादीकडून चर्चेत आल्यानंतर लाड यांच्या गोटात थोडी चलबिचल झाली मात्र शरद पवार यांनी लाड यांना कुंडलच्या कार्यक्रमात दिलेला शब्द खरा करीत महाआघाडीची उमेदवारी बहाल केली. इथली शिक्षक मतदारसंघाची जागा कॉंग्रेससाठी घेतल्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील बेबनावाची शक्‍यता संपली. जी एरवी भाजपच्या पथ्यावर पडायची. या निवडणुकीत 62 उमेदवार रिंगणात असल्याने ते मोठी मतविभागणी करतील अशीही भाजपला आशा होती.

मात्र त्या आशेवर बसलेल्या भाजपला हक्काच्या म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यातही अपेक्षित मतदान करवून घेता आले नाही. मुळात अमुकच्या इतक्‍या संख्येने असलेल्या उमेदवारांमुळे अमुक उमेदवाराला फायदा होईल असं म्हणणे म्हणजे या निवडणुकीचं तंत्र माहीत नसणं. कारण इथे मतदार नोंदणी आघाडी पक्षीय आणि नेतेमंडळीच्या पाठिंब्यापेक्षा अधिक महत्त्वाची असते. नेतेमंडळीची उपस्थिती ही केवळ वातावरण निर्मितीचा भाग असतो. जो यावेळी भाजप आणि महाविकास आघाडी दोन्हीकडून पुरता झाला. मात्र या वातावरण निर्मितीमुळे एक फायदा नक्की झाला तो म्हणजे मतदानाचा वाढलेला टक्का. गतवेळी 

गतवेळी 38 टक्के मतदान झाले होते. यावेळी 65 टक्के मतदान झाले. पदवीधर आणि शिक्षक अशा दोन्हीकडे उमेदवारांची सांगड या निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी खूप महत्त्वाची ठरली. लाड आणि आसगावकर या दोघांनीही मिळवलेले यश त्याचे द्योतक आहे. 

राज्यातील सत्तांतर, कोरोना, लॉकडाऊन, अतिवृष्टी अशा अनेक घटनानंतर पहिल्यांदाच मतदारांकडे सत्ताधारी आघाडी आणि विरोधक भाजप जनतेचा कल आजमावत होते. अर्थात हा निकाल म्हणजे सरकारच्या कामगिरीची चाचणी ठरेल असे कितीही दोन्ही नेते मंडळी प्रचारात म्हणत होती. मात्र ते या निकालानंतरही पूर्णांशाने खरे मानता येणार नाही. कारण ही निवडणूक तंत्राची आहे. त्यात अरुण लाड सत्तेच्या मदतीने पास झाले असे मात्र नक्की म्हणता येईल. 

दोन प्रदेशाध्यक्षांच्या प्रतिष्ठेची निवडणूक 
चंद्रकांत पाटील व जयंत पाटील या राज्यातील दोन बड्या पक्षांच्या प्रदेशाध्यक्ष असलेल्या नेत्यांची प्रतिष्ठेची ही निवडणूक होती. या दोघांत वाक्‌ युद्धही रंगले होते. अखेर जयंतरावांनी चंद्रकांतदादांचा करेक्‍ट कार्यक्रम केला. यानिमित्ताने समाज माध्यमावर दादांवर होत असलेली टीका त्यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा ठळकपणे उघड करणाऱ्या होत्या. ज्या भाजपच्या विस्तारवादाच्या धोरणालाही मर्यादा घालणाऱ्या ठरतील. 

संपादन : युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com