'औज'ची समस्या सोडविण्यासाठी सोलापूरच्या महापौरांचे मुख्यमंत्र्यांना साकडे 

Solapur Municipal Corporation
Solapur Municipal Corporation

सोलापूर : औज आणि चिंचपूर बंधाऱ्यातील पाण्याचा कर्नाटक हद्दीतून सतत होणारा उपसा थांबविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार असल्याचे महापौर शोभा बनशेट्टी यांनी "सकाळ'ला सांगितले. दरम्यान, हा प्रश्‍न कायमस्वरूपी मिटावा यासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. यासंदर्भात ' सकाळ' मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते.

विजयपूर जिल्ह्यातील संख आणि धुळखेड गावातील शेतकऱ्यांकडून औज आणि चिंचपूर या दोन्ही बंधाऱ्यांतून सातत्याने पाण्याचा उपसा केला जात आहे. त्यामुळे या बंधाऱ्यातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. महापालिकेच्या नियोजनानुसार सध्याचे पाणी 5 जानेवारी 2019 पर्यंत शहराला देणे शक्‍य आहे. मात्र, सातत्याने होत असलेल्या उपशामुळे डिसेंबरच्या पंधरवड्यातच दोन्ही बंधारे कोरडे पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी संख व धुळखेड येथील शेतीसाठीचा वीजपुरवठा नियंत्रित करण्याचे पत्र विजयपूर जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. 

बंधारे भरले की ही समस्या निर्माण होते. त्यामुळे त्यावर कायम तोडगा काढावा, असे पत्र मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचे सौ. बनशेट्टी यांनी सांगितले. त्या म्हणाल्या,""हा प्रश्‍न दोन राज्यांशी संबंधित आहे. त्यामुळे सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यावरही परिणाम होणार नाही आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांनाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने तोडगा काढण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करणार आहे.'' दरम्यान, दोन्ही बंधाऱ्यांच्या परिसराची पाहणी करण्यासाठी महापालिकेच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. बंधाऱ्यात पाणी असेपर्यंत हे पथक प्रत्येक आठवड्यात बंधारा परिसरात जाऊन पाहणी करणार आहे. 

पावसाळ्यापर्यंत "एबीडी' ला तीन दिवसांआड पाणी 
हिप्परगा तलावातील पाणी संपल्याने स्मार्ट सिटी योजनेतील परिसराला पावसाळ्यात हिप्परगा तलाव पूर्ववत होईपर्यंत तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. उजनी योजना आणि दयानंद टाकीवर अवलंबून असलेल्या दक्षिण व उत्तर कसबा, भवानी पेठचा काही भाग, घोंगडे वस्ती या परिसराचा एबीडी एरियातील या योजनेत समावेश आहे. रोज एक तास पाणी या प्रमाणे सुरवातीला काही दिवस पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र खंडित वीजपुरवठ्यामुळे नियोजन विस्कळित झाले आणि त्यानंतर आता हिप्परगा तलावातील पाणी संपल्याने एबीडी एरियाला तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com